Author: Adi Sathe

  • शपथ

    सये नको तू जाऊस
    खेळ मांडला सोडून,
    तुझ्याविना माझा पहा
    श्वास राहतो आडून.

    अशी उठतेस जेव्हा
    खेळ अर्धा टाकून,
    जणू वाटते हा जातो
    जीव शरीर सोडून.

    सखे शपथ ही तुला
    नको जाऊस उठून,
    कोण मांडेल हा डाव
    जर गेलीस मोडून..

  • प्रतिबिंब

    दुसऱ्याला दाखवताना
    कधी त्यालाही वाटते,
    माझेही प्रतिबिंब
    कुणी मला दाखवावे.

  • पाउस आणि तो,

    पावसाची पहिली सर येताच आठवते तुझे हसू,,
    जवळ तू नाहीस बघून डोळ्यात दाटतात आसू….

    —-|||—-

    बाहेर लागलीये पावसाची झड,
    उसंत नाही कायम झरझर.
    संध्येच्या या धुंद एकांतात,
    मनात बरसतेय आठवांची सर.

    —-|||—-

    कुंद धुंद एकांत हा,
    विरहाचा सोबती,
    गुलाबी थंड वर अन,
    एकटा मी एकांती.

    —-|||—-

  • किनारा

    दूर अजुनी किनारा
    ही ओढीची जलधारा
    कसे जावे पैलतीरा
    पाठ फिरावी हा वारा

    त्या पैलतीरावरी
    वाट साजण पाहतो.
    त्या एका भेटीसाठी
    सारा जीव तो झुरतो.

  • कसले हे नियोजन?

    भारताच्या नियोजन आयोगाच्या कृपेनी भारताच्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे श्रीमंतीची. होय, तुम्ही दिवसाला २९ रुपये खर्च करता का? मग तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दिवसभरात दोन वेळचं जेवता? होय तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दोनदा चहा पिता? होय तुम्ही श्रीमंत आहात. नियोजन आयोगाच्या कृपेनी आज भारतातील दारिद्र्यारेशे खालील माणसे खूप कमी झाली असतील निश्चित. हो आणि हे आकडे आहेत शहरातील लोकांसाठी. कदाचित खेड्यात लोकांनी जर दिवसाला ५ रुपये खर्च केले तरी देखील ते श्रीमंत म्हणून मिरवू शकतील. म्हणे शहरांमध्ये ५ रुपयात भाकरी, ३ रुपयात पोळी, ५ रुपये दिले तर भाजी मिळते. मायबाप सरकार कृपा करून अशा दुकानांची यादी तरी जाहीर करावीत. मग खरच जर २९ रुपयात जगता आला तर उरलेले पैसे आम्ही तुमच्याच कंपन्यांच्या दारूवर उडवू म्हणजे तुम्ही अजून श्रीमंत व्हाल. मायबाप सरकार, या नियोजन आयोगाला सामान्य माणसाच्या तर्फे काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. नियोजन आयोग हे विसरला का की माणसाला अन्नाव्यतिरिक्त वस्त्र आणि निवार्याची सुद्धा मुलभूत गरज आहे. या २९ रुपयात आम्ही घरभाड आणि कपड्याचा खर्च कसा बसवावा मालक? झालंच तर रातच्याला घरामध्ये दिवाबत्ती करावी लागते. त्याच्यासाठीची काही सोय लावलीये का हो मालक? मालक जरा सांगा नं, आयत्यावेळी काही झाला न इस्पितळात जावा लागला तर त्याचा खर्च कुठून करायचा हो?
    असेही आम्हाला आता ही दुकाने शोधावी लागणारच आहेत की. तुम्ही आम्हाला एकच सिलेंडर देणार आहात स्वयंपाकाला. तो जर आयत्या वेळी संपला तर आमची जी धावाधाव होणार आहे ती टाळण्यासाठी अशा स्वस्त आणि मस्त दुकानांमध्ये जाऊन जेवानेच आम्हाला सोयीचे वाटणार आहे. अगदीच सणाचा गोडधोड आपला घरी करावा आणि ते देखील जर सरकारनी सणासुदीसाठी २९ रुपयांव्यातीरिक्त काही वर्खार्चास रक्कम दिलीत तर. सिलेंडर चा काळाबाजार तुम्हाला थांबवता येत नाही म्हणून आम्हाला का त्रास देता तुम्ही?तुम्ही म्हणाल ते पैसे देतो नं त्या सिलेंडरचे? आणि रीतसर परवानगी घेऊन तर २ घेतोय. आता पुरात नाहीत तुम्हाला सिलेंडर तर नवीन बनवून घ्या नं का आपल्या देशातला लोखंड संपलं सगळं? सगळे कर देतो तुम्हाला, अगदी बिन बोभाट. तरी तुमचे सगळे निर्बंध आमच्यावर. जे लोक फुकट ग्यास वापरतात, कर देत नाहीत, वीज चोरी करतात त्यांना मात्र काही त्रास नाही. मायबाप काहीही उपाय करू नका यावर तुम्ही, नाहीतर आत्ता २९ रुपये तरी देताय तुम्ही उपाय शोधलेत तर आम्हाला कदाचित ४-५ रुपये खर्च करा म्हणून सांगाल…..

  • देवा, नाही झाला घोटाळा?

    देवा मला सांग अगदी खरी गोष्ट एक,
    बेट्या माणसाला का नाही बनवलास नेक?

    मारे दिलीस बुद्धी त्याला तू सकस,
    पण का दिलास मनात आकस?

    कणभरही स्वतःची प्रगती नाही,
    दुसऱ्याची आजीबात पाहवत नाही.,

    भ्रष्ट हावरट एकजात हा माणूस सगळा,
    वरून बगळा आतून पक्का कावळा काळा.

    नाही पडत का हा प्रश्न कधी तुला?
    माणसाला बनवून नाही झाला घोटाळा?