Author: Adi Sathe

  • भेट

    ढगाच्या अडून एक थेंब हळूच वाकून म्हणाला,
    काय पृथ्वीराणी, येऊ का तुला भेटायला?
    बरेच दिवस भेट नाही, बहुदा वर्ष झालं,
    तू ही बोलावलं नाहीस हे मात्र सलत राहीलं,
    आता मी थांबणार नाही, मी ठरवून टाकलं
    तू बोलावलं नाहीस तरी मी घर सोडलं,
    तुझ्या अंगणी मुक्काम जोवर सांगत नाही जायला.
    ना जाणो परत किती उशीर आपण भेटायला.

  • गुज

    “मनातल्या मनात खरं तर किती वेळा याची प्रॅक्टिस केली होती. पण आयत्या वेळी घोळ व्हायचा तो झालाच. ऐन वेळी मनाची पाटी साफ कोरी कशी होते कळत नाही. नेमक्या वेळी बरोब्बर दगा कसा द्यायचा या मनाकडून शिकावं. बेटा नको तेव्हा विसरतो. अन् मला कळत नाही फक्त ती समोर असतांनाच? श्या काही खरं नाही.” दिग्याचे प्रियाला भेटून येतानाचे विचार. अर्थात ही काही पहिलीच वेळ नव्हती असे विचार येण्याची. वास्तविक चांगले ५ – ६ वर्षांपासून एकमेकांबरोबरच असतात कायम. कॉलेजमध्ये, बाहेर भटकायला गेल्यावर, कधी कोणत्या व्याख्यानाला तर कधी एखाद्या छानशा गाण्याच्या मैफिलीला कुठेही गेले तरी ही जोडगोळी बरोबरच. मग त्यांच्या कंपूतली मंडळी सोडणार आहेत होय. तसं चिडवणं पहिल्या वर्षातच सुरु झाला होता. पण आजकाल कॉलेज संपल्यामुळे नेहमीसारख्या भेटीगाठी होत नव्हत्या. 

    दिग्या मनात ठरवून गेला होता आज भेटायला. त्यासाठी चक्क बाकी लोकांना टांग देऊन दोघंच भेटली होती पण नेहमीसारखे मुग गिळून महाराज परतले होते. “दिग्या, दिग्या कसं होणार रे तुझं. लेका धड प्रपोज करता येत नाही तुला? मारे इतरांना शिकवत असतोस असं कर अन् तसं कर. आता कुठे गेले तुझे सगळे फंडे? कळलं ना आता कशी तंतरते ती समोर आल्यावर. किमान आता तरी बढाया मारत जाऊ नकोस, अन् फुकट सल्ले तर आजिबात देऊ नकोस लोकांना.” दिग्याच स्वतःलाच उपदेश देणं चालूच होतं; अर्थातच मनात.

    “लेका संधी एकदाच येते रे. घालवलीस न वाया. ठरवलंच तिच लग्न तिच्या परम्पुज्यांनी कोणाशी तर? आयुष्यभर रडत का बसणारेस? उगीच भीतोस नाही म्हणेल म्हणून. तिला असं वाटतच नसतं तर बाकीच्यांना टांग देऊन तुझ्याबरोबर एकटीच कॉफी पीत बसली असती का? काय तरीच तुझं आपलं.” दिग्याच मन त्याची शाळा घेतं. “तू तर काही बोलूच नकोस. ऐन वेळी घोळ घालणारा तूच आहेस. सगळं विसरायला कोणी सांगितलेलं? अर्थात माझाही गाढवपणा आहेच. या गोष्टी पाठ करून थोड्याच बोलता येतात. पण तू जा रे तुझा जाम राग आलाय मला. मी पाठांतर करायचा गाढवपणा केला तो केला, तुला विसरायला कोणी सांगितलेलं?” दिग्या आपलं उगीच मनाशी वाद घालत बसलेला.

    तेवढ्यात मोबाईल वाजला. प्रियाचाच मेसेज…………

    “दिग्या काय बोलायचय? काही नाही म्हणू नकोस मार खाशील. गेली ६ वर्ष खूप जवळून ओळखते तुला. तुला बोलायचा होतं खास पण बोलला नाहीस.” “आईचा घो…. हिला कसं कळलं.” “दिग्या लेका मगापासून सांगतोय तुला, वाट बघण्यात वेळ घालवू नकोस” “तू गप् रे साल्या. हिला काय उत्तर देऊ त्याचा विचार करू दे आधी.” मनाचे आणि दिग्याचे संवाद चालूच होते. ‘उद्या भेट मग सांगतो’ दिग्यानी वेळ मारायला म्हणून मेसेज करून टाकला. दुसऱ्या मिनटाला उलट मेसेज. ‘ठीके उद्या दुपारी ५ ला आपलं निहेमीच कॅफे.’

    हुश्श. आजचं टेन्शन टळलं म्हणत दिग्या एकदाचा घरी पोचला. पण मनातला द्वंद काही संपेना. अगदी रंगीला मधलं गाणंच सारख मनात वाजत होतं. ‘क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्कील हाय, कोई तो बता दे इसका हल तो मेरे भाय.’ रात्रभर असाच एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत उद्या काय बोलायचं याचा विचार करत. “गधड्या परत ठरवून जातोयस?” मनानी पुन्हा एकदा त्याला डिवचले. दिग्यानी उत्तर द्यायचं टाळलं.

    दिवसभर हुरहूर मनात घेऊन दिग्या संध्याकाळची वाट पाहत होता.  एकदाचा चारचा ठोका पडला आणि दिग्या ऑफिस मधून सटकला. कधी एकदा कॅफेला पोचतोय असं झालेलं. आज काही केल्या प्रियाला सांगितलंच पाहिजे असं मनाशी ठरवून तो निघाला होता. घरी आपलं ऑफिस बॅग टाकायला आणि जरा चांगले कपडे घालायला म्हणून टेकला की पुन्हा बाहेर. धीर धरवत नव्हता लेकाला. बरोबर ५ ला दिग्या कॅफेवर पोहोचला. नेहमीसारखाच प्रियाचा पत्ता नव्हता पण आज दिग्याची चीडचीड झाली नाही.

    तिथेच कोपऱ्यातल टेबल पकडून दिग्या बसला खरा पण नजर कायम रस्त्यावर. पायांची अस्वस्थ हालचाल. घड्याळ जसे जसे पुढे सरकत होते तसे दिग्याचे पाय बसल्याजागीच जास्त नाचू लागले. त्याचं मन संधी सोडतय होय. “काय दिग्या, आज बाजी मारणार का?” दिग्या वैतागून उत्तर देणार तोच नजर रस्त्यावर गेली आणि जणू दिग्यासाठी सारी दुनिया स्तब्ध झाली. मनात कुठे तरी सॅक्सोफोन वाजू लागला. आजूबाजूला अंधार पडला आणि एक शुभ्र स्पॉटलाईट प्रियावर स्थिरावला. आजूबाजूच्या स्तब्ध गर्दीतून सफाईनी वाट काढत येणाऱ्या प्रियापुढे त्याला मार्लीन मेन्रो देखील कमी वाटत होती.

    प्रिया पार टेबलाजवळ येऊन पोचली तरी दिग्याची समाधी संपेना. प्रियानी नेहमीसारखा त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याचा भांग विस्कटला अन् वाजणारे सॅक्सोफोन क्षणात थांबले, आजूबाजूला लक्ख उजेड होता. आणि प्रिया त्याच्या समोर उभी होती. दिग्या गडबडून भानावर आला. “हॅलो…. प्रिया….” दिग्या अडखळत बोलला.

    आजही दिग्याच्या डोक्यात तोच ब्लॅक आउट. एक टक बघत बसला होता तिच्याकडे. शेवटी प्रियानीच बोलायला सुरवात केली. नेहमीसारखी तिची बडबड चालू. रोज तिच्या गप्पांमध्ये रस घेणारा दिग्या आज आतून बधीर होता. तिचा बोलणं कानावर पडत तर होता पण झेपत काहीच नव्हतं. “आउच…..” शेवटी प्रियानी त्याचं कान पिळून त्याला भानावर आणले. ही पण तिचीच खास स्टाईल. अन् दिग्या तिच्या याच बिनधास्तपणावर फिदा होता.

    महाराज भानावर आले खरे पण मनातले भाव काही केल्या ओठावर येईना. उगीच इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा चालत राहिल्या. एक गोष्ट बोलताना मधेच अचानक विषय बदलून टाकायचा. पण काही केल्या त्याला हवा तो विषय काढता येत नव्हता. शेवटी हिम्मत करून बोलता बोलताच प्रियाचा हात हातात घेतला. अन् टेबलवर क्षणात शांतता पसरली.

    क्षणात दोघांचे अंग मोहरून गेले. कॅफेमध्ये जणू आता ते दोघेच उरले होते. मगाचेच जॅझचे सूर आता दोघांसाठी वाजू लागले. प्रकाश मंद झाला. दिग्या हळूच उठला आणि प्रियाचा हात धरून तिला मोकळ्या जागेत घेऊन गेला. हळूच कमरेत हात घालून तिला जवळ ओढले आणि सॅक्सोफोनच्या सुरावर दोघे आपोआप झोके घेऊ लागले. सुरावट संपली तसे दोघे भानावर आले. त्याच टेबलवर बसलेले होते, लख्ख प्रकाश होता, आजूबाजूला बसलेले ग्रुप्स आणि कपल्सदेखील तसेच होते.

    प्रियाचा हात अजूनही त्याच्या हातातच होता, अन् तिची नजर खाली झुकली होती. ओठावर आलेल्या मंद स्मितामुळे गालांवर नाजूक खळी पडली होती. तिला हसलेली पाहून दिग्याचा जीव भांड्यात पडला. हिम्मत एकवटून त्यांनी हातातला हात हळूच दाबला तशी प्रियाच्या गालांवर लाली उमटली. दिग्याच्या मनातील गुज अगदी निःशब्दपणेच प्रियाच्या मनाला जाऊन भिडले.

  • मानसी तू लिहितेस पण?

    मानसी, कधीही वाटलं नव्हतं आपण भेटू, आणि एक दृढ मैत्री, एक भावा-बहिणीचं घट्ट नातं विणले जाईल. कधी भेटलो कसे भेटलो हा भाग आपल्यासाठीच ठेवू. वास्तविक तू छान गातेस, भरपूर वाचतेस इतकं माहित होतं. पण मला आत्ता सांगायची आहे ती आठवण खूप वेगळी आहे. मला अजून आठवतो तो तू लिहिलेला सुरेश भटांवरचा लेख. अगदी त्या क्षणापर्यंत मला माहित नव्हतं तू इतकं छान लिहितेस सुद्धा. आपल्या कॉलेजच वार्षिक प्रकाशित करायचं होतं. मी त्या वर्षीसाठी संपादक होतो. अगदी उत्साहात तू काही लिहून देऊ का म्हणून विचारलस.
    दोनच दिवसात दोन फुलस्केप पाने माझ्या हातात ठेऊन तू मोकळी झालीस. हातात पडेल ते वाचायला लागणारा मी त्या वेळी मात्र दोन मिनिट त्या कागदांकडे बघत राहिलो; तुझं सुटसुटीत अन् सुंदर अक्षर बघून. तुझं लेख वाचून भटांशी माझी जास्त ओळख झाली. नाही तर मला फक्त “लाभले आम्हास भाग्य” आणि “रंग माझं वेगळा” इतकेच भट माहिती होते. नंतर कुठे काय माशी शिंकली देव जाणे. प्रकाशनाचे काम थांबले अन् पुढे बारगळलेच.
    आज आठवण झाली त्याचं कारण म्हणजे “रंगुनी रंगात साऱ्या” च. खूप दिवसांनी गाणं कानावर पडलं आणि भूतकाळाचा पडदा हलला. पुन्हा दोन मिनिट तुझं टपोर अक्षर बघत थांबून मग लेख वाचायची इच्छा झाली. अजूनही जपून ठेवलाय लेख पण नेमका नाशिकला घरी आहे. का बंद केलंस लिहिणं? तुला पुन्हा लिहीतं झालेलं पहायचं आहे.

  • सावल्या

    अनेक अनेक आठवांच्या सावल्या
    मनाच्या कोपऱ्यात हळुवार जपल्या
    अंमळ हळव्या किंचित रडव्या
    बऱ्याच हसऱ्या काही खोल गहिऱ्या
    वर येतात अचानक जणू श्वास घ्यायला
    डोळ्याच्या कडा हळूच ओल्या करायला.

  • धावपळ पडद्यामागची

    स्नेहसंमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह, बेभान होऊन काम करणारे हौशी कलाकार आणि बऱ्याचदा त्यांची टर उडवणारे प्रेक्षक. काय वाटेल ते करतात काय विचारू नका. खुर्च्यांवर उभे राहून जा जा असे हातवारे करणं, ग्रुप मध्ये उठून कवायती करणं. एकाच वेळी सगळ्यांनी मागेच काय बघायला लागणं. काही विचारू नका. या सगळ्या गोंधळात खरा कस लागतो तो पडद्यामागील कलाकारांचा. अन् त्यातही सगळ्या सादरीकरणांना सांधून एकसंध कार्यक्रम देणाऱ्या निवेदकांचा.
    अभियांत्रिकीतील स्नेहसंमेल खास वाटतं ते याच धावपळीसाठी. वास्तविक माझं पहिलच. त्या अगोदर रंगमंचावर उभं राहिलेलो ते पहिली दुसरीत असेन. प्रत्येकाला वेळ दिलेला असून पडद्यामागे प्रचंड गोंधळ. अभियांत्रिकी करणारे तसे सगळे कलाकारच. परीक्षा पास होण्याकरता अनेक कला दाखवतात. पण स्टेज वर जायची पाळी आली की कुठे दडून बसतात देव जाणे. ५० वेळा ओरडल्यावर उगवणार. तर काही जण सारखं येऊन आम्ही कधी स्टेजवर जाणार असा विचारात बसणार. कोणाला वेळा बदलून हव्या असतात. एक ना अनेक गोष्टी.
    या सगळ्या आघाड्यांवर तोंड देत बाजीप्रभू सारखी लढणारी सुप्रिया आजही डोळ्यासमोर आहे. कार्यक्रमात बदल झाले की त्यासाठी त्या त्या निवेदकांचा शोध. ते तरी कसले स्टेज मागे थांबणार? धुडगूस घालायची संधी कोणी सोडणारे होय. एखादा सापडलाच नाही तर आयत्या वेळी कोणाला स्टेजवर ढकलायचा, कोणाला कधी थांबवायचा. या सगळ्याची नोंद करत करत हातातला मूळ क्रम लावलेला कागद पार कला पडलेला.
    प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आयत्यावेळी उभी केलेली मामाची मामी मात्र या सगळ्या धावपळीचा कळस होता. मामा त्या वर्षीचा स्टार होता. मामा ही काय वल्ली होती ती पुढे कधीतरी सविस्तर सांगीनच. पण या मामाला हुडकला तो सुप्रियानीच. पण त्याचं काम बघायला काही तिला बघायला मिळालं नाही. खायची प्यायची शुद्ध नसलेल्या सुप्रिया दिवसाखेरी सुटकेचा निश्वास टाकायची.
    कार्यक्रम संपला तरी आमची अख्खी टीम चहा पीत गप्पा ठोकत बसायची. या मॅडम तिथे असायच्या, हसायच्या देखील पण मनात चाललेलं उद्याच नियोजन न त्याच येणारं थोडसं टेन्शन तिच्या त्या हसण्यातून पण डोकवायचं. जणू काही एखादा बाळंतपण केलं असं समाधान तिच्या चेहेऱ्यावर शेवटच्या दिवशी होतं. एका अर्थी हे बाळंतपणच होतं मामाच्या भूमिकेचं, आयत्यावेळी शोधलेल्या मामीचं, माझ्यातल्या निवेदकाचं.
    कॉलेज संपल तशी सगळ्यांची पांगापांग झाली. पण मनात या आठवणी तशाच घर करून होत्या; आहेत. सुप्रिया पण अमेरिकेत पुढे शिकतेय. पुढची वाटचाल पण ती त्याच जिद्दीनी आणि आत्मविश्वासानी नक्की करेल यात शंका नाही. खूप शुभेच्छा.

  • नीरज – मनाच्या कोपऱ्यातला

    IMG_7042कुठल्या आठवणी कधी जाग्या होतील सांगता येत नाही. वास्तविक शाळेच्या दिवसातल्या लक्षावधी आठवणी मनात दाटून आल्या पण मन स्थिरावलं ते शनिवार वर. शनिवारी आम्हा मित्रांचं ठरलेलं काम. नीरजला जाऊन शाळेत जाण्यासाठी उठवायचं. त्या ६ वर्षांत नीरज शनिवारी आपणहून आधी उठल्याच मला आठवत नाही. आम्ही सगळे मित्र त्यासाठी जास्त लवकर उठायचो. आवरून सावरून सायकली पिटाळत त्याच्या घरी हजर.
    वर जाऊन महाराजांना उठवायचं. त्याचा आवारे पर्यंत आम्ही सगळे मित्र खुर्च्यांमध्ये पेंगत उरलेली झोप वसूल करायचो. मग काकूंनी दिलेलं गरम गरम दुध पिऊन आमची टोळी बाहेर पडायची. सुरवातीची वर्ष बस नी अन नंतर सायकलींवर. शाळेत जाण्याच्या अनेक आठवणींची रंगच या नंतर मनात आली.
    अजूनही आठवतात ते उंच काका. ते बस थांब्यावर दिसले की आमची टोळी खुश. आमच्या घरून शाळेपर्यंत जायला रिक्षाला ३ रुपये पडायचे न बस ला १ रुपया. आम्हा ६ लोकांना उंच काका त्यांच्या रिक्षातून फक्त १ रुपयात थेट शाळेपर्यंत सोडायचे. पुढे ८-९ वी मध्ये सायकल हातात आली आणि उंच काकांची रिक्षा शाळेच्या प्रवासातून बाद झाली.
    १० वी मध्ये तर सगळीकडे सायकल वाऱ्या. पाहते ६ पासूनच क्लास असायचे. घमंडी मॅडम चा संस्कृत क्लास म्हणजे घरचीच शिकवणी असल्यासारखी असायची. क्लास नंतर तिथेच डबा खाण, गच्चीत फुटबॉल खेळणं, काय विचारू नका. नंतरचे इंग्लिश गणिताचे क्लास मात्र क्लास सारखेच व्हायचे. मग दिवसभराची शाळा उरकून घरी पोचायला संध्याकाळचे ६ वाजणार. १० वी संपली आणि सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तरी भेटी गाठी अजूनही चालूच आहेत. पण नीरज नी खूपच वेगळी वाट धरली. कधीही परत न भेटण्याची. सोबत देऊन गेला त्या या सगळ्या हृद्य आठवणी कायम बरोबर बाळगण्यासाठी.