Author: Adi Sathe

  • मुखवटा

    मुखवटा

    लपवले जे आहे मनाच्या तळाशी,
    कितीदा उफाळून येई किनारी,
    आंदोलती वादळे जरी अतरंगी,
    चेहेऱ्यावरी स्तब्धतेचा मुखवटा….

    दिसामागुनी दिवस जाती निघूनी,
    तरी वादळे नाही शमली जराही,
    अचानक अशी ती येता समोरी,
    तत्क्षणी गळाला मुखीचा मुखवटा….

    Image credit : Suvarna Sohoni

  • ब्लॅक अँड व्हाइट

    ब्लॅक अँड व्हाइट

    सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा विशिष्ट रंगात रंगवणे असेल किंवा आवडता Music video टाकणे असेल. कित्येकांना बऱ्याच वेळा या वेगवेगळ्या फिल्टरमागचे कारण माहितीही नसते हे त्या LGBTEQ+ च्या इंद्रधनुष्याला आपल्या फोटोंवर रंगवताना कित्येकांनी नकळत उघड केले.

    कधी कधी चॅलेंजेसचं पेव फुटतं. मग काय ice bucket challenge पासून love your partner challange पर्यंत अखंड मालिका सुरु असते. याच मालिकेत दीड दोन महिन्यांपूर्वी ब्लॅक अँड व्हाइट चॅलेंज फिरत होतं. मुळात मला या प्रकारात काही चॅलेंजिंग आहे हेच वाटत नव्हतं. आपला स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो लावायचा यात कसलं आलंय चॅलेंज?

    हा आता जर त्या फोटोत तुम्ही माकडचेष्टा करा असं सांगितलं तर कदाचित काही लोकांना ते जरा चॅलेंजिंग झालं असतं. कल्पना करा न, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO, chairman आपापल्या सोशल मिडियावर वाकोल्या दाखवणारे ब्लॅक अँड व्हाइट फोटो मिरवत आहेत. इतकंच काय तर सदा गंभीर चेहेऱ्याने वावरणारे राजकारणी संसद सोडून इथेपण लहान मुलांसारखे एकमेकांना फोटोतून वाकोल्या दाखवतायत. पण लहान पोराटोरांची आणि मनात लहान पोर जपलेल्या लोकांची या अटीमुळे एकदम धमाल चालू आहे. कोण किती कल्पकतेने माकडचेष्टा करू शकतं याची जणू स्पर्धाच लागली आहे.

    पण मला स्वतःला हा कृष्णधवल प्रकार फार आवडतो. एक हौशी छायाचित्रकार म्हणून कित्येकवेळा मी या रंगसंगतीमध्ये फोटो काढतो. केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या विविध छटांतून फोटोतले बारकावे बघायला इतकं छान वाटतं. पण हे मात्र खरं आहे की ब्लॅक अँड व्हाइट मध्ये काम करताना सारं कसब पणाला लागतं. जरा इकडे तिकडे झालं की फोटो एक तर पांढरा होतो नाही तर एकदम अंधारा. कित्येक वेळा तर १०-१५ प्रयत्न करावे लागतात. पण आजकाल फोटोंना फिल्टर लावणे मोबाईल मधल्या कित्येक फोटो एडिटिंग अॅप्समुळे इतकं सोप्प झालं आहे त्यामुळे या ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफीमधली सारी मजाच निघून जाते.

    रंगीत फोटोमध्ये रंगांची मजा येते पण कृष्णधवल फोटोंमध्ये जो प्रकाशाचा खेळ दिसतो त्यातली मजा काही औरच आहे. हा लेख लिहितांना मला हे प्रकर्षानी जाणवतंय की खूप महिन्यांत मी माझा कॅमेरा हातात घेतला नाहीये. मोबाईल कॅमेरा चांगला असल्याने जरा आळशी झालोय. पण आता नक्कीच कॅमेरा उचलून कुठेसे जायची वेळ आली आहे. चला, येताय माझ्याबरोबर? जाऊया भटकंतीला. नाही तर मी येईनच तुमच्यासाठी फोटो घेऊन. आणि नक्कीच त्यातले बरेच फोटो ब्लॅक अँड व्हाइट असतील.

  • रिओ २०१६ च्या निमित्ताने

    रिओ २०१६ च्या निमित्ताने

    “दिसामाजी काही तरी लिहावे” हे समर्थवचन लहानपणापासून माहिती आहे, पण माहिती असलेलेल्या किती तरी गोष्टी नुसत्या माहितीतच राहतात. त्यानुसार का कधीतरीच होतं. ‘बंधमुक्त’ लिहिलं त्याला आज २०-२५ दिवस झाले. मनात पक्की खूण बांधली होती की दर आठवड्याला या धाटणीचा किमान एक छोटा लेख लिहायचा. पण असं ठरवल्याबर हुकुम घडेल तर ती तुम्हा आम्हा सामान्य जनांची कहाणी कशी होईल?

    आता तुम्ही लगेच म्हणाल, “आळशी आहेस, ठरवलं आणि मनापासून इच्छा असली की सर्व काही जमतं.” यावर आपलं अगदी एकमत आहे हो, पण काही न काही कारण होऊन या गोष्टी लिहिणं राहूनच जातं. दर आठवड्याला कुठलेसे सदर लिहिणारे लेखक, YouTubeवर नियमितपणे creative content तयार करणारे कलाकार या साऱ्यांचा मला या एकाच कारणामुळे हेवा वाटतो. पण त्याच बरोबर यांच्याकडून मला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन देखील मिळत असतं.

    मागला आठवडाभर सर्वत्र olympic चे वारे वाहत आहेत. गेले दोन दिवस तर भारतीयांच्या आनंदाला सीमा उरल्या नाहीयेत. साक्षीच पाहिलं वहिलं कांस्य पदक आलं आणि या रिओ २०१६ मधला भारताचा भोपळा फुटला. पाठोपाठ सिंधूनी आपल्या खात्यात एक रजत जमा करून पदक तालिकेत भारतासाठी १० जागांची लांब उडी मिळवून दिली.अर्थातच दोघींवर कौतुकाचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात सुरु झाली. पण सारा देश त्या आधी भारताच्या पदरी आलेल्या शून्य पदकांवरून पार टोकाच्या भूमिका घेऊन मोकळा झाला होता. रामाजाच्या सर्व स्तरांतून निराशावादी सूर येत होता. सरकारच्या नाकर्तेपणापासून ते “फक्त सेल्फी काढायला गेलेत का?” इथपर्यंत कित्येक वेगवेगळे तर्क सुरु होते.

    पण olympic मध्ये खेळण्यासाठी पात्र व्हायला या सर्व खेळाडूंनी कित्येक वर्ष जीवाचं रान केलं याकडे कोणलाच लक्ष द्यावेसे वाटत नव्हते. मनात आलं म्हणून गेलो olympic ला असा थोडंच आहे? आपल्या देशात एकूणच क्रीडा क्षेत्राबाद्द्ल अनास्था आहे यात वाद नाही. पण या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे सर्व खेळाडू आपल्या देशाच्या नावासाठी तिथे जीवाचं रान करत असतात. मैदानावर उतरताना दिवसाच्या शेवटी भारताचे राष्ट्रगान कसे वाजेल याचेच गणित, आणि त्यासाठी करायचे डावपेच प्रत्येकाच्याच मनात असणार यात तिळमात्र शंका नाही.

    आपापल्या घरात टीव्ही समोर बसून त्यांचे यशापयश बघत आजूबाजूच्यांना फुकटचे सल्ले देणं खूप सोपं आहे. हे सर्व खेळाडू आपापल्या खेळांमध्ये भारतात अव्वल आहेत हे मात्र सर्व जण सोयीस्करपणे विसरलेले असतात. आज वयाच्या वीस बाविसाव्या वर्षी आपल्या देशाची मान अभिमानाने ताठ करण्यासाठी सर्व खेळाडू प्रयत्नशील आहेत. त्यांच्यावर टीका करताना किंवा हरले म्हणून आपल्याच घरात आणि सोशल मिडियावर आरडा ओरडा करतांना आपण त्या वयात काय करत होतो याकडे हळूच वळून पाहिलं तर फार बरं होईल. सर्वच गोष्टींची जबाबदारी सरकारवर ढकलण्यापेक्षा आपापल्या परीनी यात कसा बदल करता येईल याकडे जर सर्वांनी लक्ष दिलं तर भारत टोकियो २०२० मध्ये नक्कीच जास्त पदकांची आशा करू शकेल.

  • एकांतात मी तुला बघायचो,
    एकटक तिच्याकडे बघताना,

    ऐकू यायची ती धडधड,
    घालमेल मनाची वाढताना,

    वाचले मी डोळ्यातले भाव,
    ओठांवर येऊन अडकताना.

    अनुभवलंय मूकपणे मी,
    अबोल्यातून नातं घडतांना,

    सांगणार कसं तुला हे सारं,
    या आरशाला आवाज नसताना……

  • बंधमुक्त

    बंधमुक्त

    माहित नाही काय कारण आहे, पण कित्येक वेळा मला खूप काही लिहावसं वाटतं पण एक विषय म्हणून डोक्यात पक्का होत नाही. अनेक विषयांचे असंख्य तुकडे तुकडे गर्दी करून असतात डोक्यात. कित्येकदा समोर असलेल्या कागदांचा पोत, रंग तर कधी नवीनच घेतलेले पेन. असं काही न काही मला लिहायला प्रवृत्त करत असतं पण मन आणि डोकं आजीबात साथ देत नाही.

    नुकतच सादत हसन मंटोचं पुस्तक वाचनात आलं. त्यात तो स्वतःच्या गोष्टींबद्दल लिहिताना म्हणतो की गोष्टी माझ्या खिशातून तयार होतात. त्या माझ्या डोक्यात मनात कधीच नसतात. त्यांना मी खिशात घेऊन फिरतो. लिहायला बसतो तेव्हा मन आणि डोकं अगदी कोरं असतं. पण कागदावर पेन टेकलं रे टेकलं कि आपोआप गोष्टी खिशातून बाहेर येऊन कागदावर उमटतात. आज माझंही तसंच काहीसं झालंय. नुकतेच छानसे रिसायकल्ड कागद आणलेत. त्यांचा रंग आणि पोत वेगळाच आहे. थोडेसे पिवळसर असलेले ते कागद सध्या रोज मला खुणावतात. त्यामुळे सारखं काही तरी लिहावसं वाटतं.

    कित्येक दिवसांनी आज मी कागद पेन घेऊन लिहितोय, नाही तर दर वेळी आपलं कॉम्पुटर कीबोर्ड वर बोटं फिरवणं चालू असतं. पण आत्तासुद्धा मनात पक्का विषय नाही. विचारांची रेल्वे सुटली आहे. गंतव्य माहिती नाही. वाटेत लागतील त्या स्टेशन वर मनात आला तर थांबायचं, पुढच्या वाटेनी खुणावलं कि गाडीनी फलाट सोडायचा अशी परिस्थिती आहे. हे माझ्या ब्लॉगवर किंवा कुठे प्रकाशित करेनच असाही नाही. आजचा हा प्रवास फक्त माझा आहे, माझ्यापुरता आहे. (तुम्ही इथे हे वाचताय म्हणजे अर्थातच परिस्थिती थोडी बदलली आहे म्हणायच)

    कुठलाही विषय नसणं किती चानाहे नाही? एका प्रकारे स्वातंत्र्यच. “येऊ का आत?” असं विचारत एखादा विचार मनात डोकावलाच, तर त्याचं बिनधास्त स्वागत करता येतं. विचारपूस करता येते. विषय आला कि एक प्रकारच बंधन आलं. एक चौकात बांधली गेली आणि अशा आगंतुक पाहुण्यांना वाटा बंद झाल्या. निघालेल्या रेल्वेला शेवटचं स्टेशन लागलं, मार्ग आखून दिला गेला आणि वाटेतले टप्पे सुद्धा ठरवून टाकले. अहो इतकाच काय, प्रवासाची वेळ सुद्धा बांधली गेली. पाठीवर एका पोतडीत समान भरायचं आणि अज्ञात प्रदेशात भटकंती करायची काय मजा असेल याचा पुसटसा अंदाज मला आज हे लिहिण्यातून येत आहे. काहीच प्लान नाही. कुठे जायची घाई नाही. जिथे असू तिथला भोवताल डोळे भरून पहायचा, मन तृप्त झालं की मनात येईल ती दिशा पकडून पुढील प्रवास सुरु. खाराचाशी एखादी ट्रीप अगदी परदेशात नाही तर निदान आपल्याच देशात कुठेशी करायला हवी. हे backpack trip च वेड Europe मध्ये बरच आहे. बॅग पाठुंगळी मारायची अन मनात येईल तिकडे निघायचं. कसलं वेगळच थ्रील आहे यात.

    समोरचा कागद बघून खरं तर मला आजीबात इच्छा नाहीये हे लिखाण थांबवायची, पण रोजच्या व्यवहारांना आमच्यासारख्या हौशी लेखकाच्या आयुष्यात फाटा थोडाच मारता येतोय? शनिवारची सुट्टी असली तरी वीकेंडची म्हणून खूप कामं साचली आहेत. पण पुन्हा हेहीत्गुज नक्की होणार. तेव्हा परत भेटूच.

  • झड

    झड

     

    बघ वाढली बाहेर
    आज पावसाची झड,
    तुझ्या आठवांनी सये
    मन झाले माझे जड.

    आठवांनी त्या क्षणांच्या
    वेचले जे तुझ्यासवे
    दोन विहिरी डोळ्यांच्या
    बघ भरती आसवे.

    आला विचार हा मनी
    पण सवाल हा पडे,
    पावसाच्या काळ्या मेघा
    धाडावे का तुझ्याकडे?

    निश्चयाची खूण मग
    माझ्या मनाशी बांधून,
    धाडतो त्या मेघाला मी,
    हाच निरोप घेऊन…..

     

    Image Credit : Omkar Paranjpe