Year: 2019

  • Undelivered letters – पुस्तक परिचय

    Undelivered letters – पुस्तक परिचय

    “साठेsss….” अशी लांबलचक आरोळी देऊन दारावरल्या टपालपेटीत पत्र टाकणारा पोस्टमन मला आजही आठवतो. पण वीस वर्षांपूर्वी पोचवायला हवी असलेली पत्र जेव्हा एखाद्या पोस्टमनला अचानक अनपेक्षितपणे सापडत असतील तेव्हा काय होत असेल? दोन दशकांच्या काळात पत्र ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती त्यांचं पुढे काय झालं असेल? आणि आत्ता त्यांना ही पत्र पोहोचवली तर त्यांना काय वाटेल? हे सारे प्रश्न तुम्हाला पडलेत ना?

    PicsArt_08-12-10.51.59मग जे. आल्कम ( J. Alchem) यांनी लिहिलेलं Undelivered letters हे छोटसं पुस्तक तुम्हाला नक्की खिळवून ठेवेल. पोस्टमन अरॉन आणि त्याची पत्नी सारा यांना अचानक ही न पोहीचवलेली पत्रे सापडतात आणि सुरू होतो एक नवं द्वंद्व समोर उभं ठाकतं. पत्र पोहोचवावी की न पोहोचवावी. ज्यांच्या नावांनी ही पत्र आहेत ते काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? आपल्या हलगर्जीपणाने झालेल्या या दोन दशकांच्या उशिरामुळे काही भयंकर तर नसेल घडले? या साऱ्या प्रश्नांच्या गदारोळात अडकलेल्या अरॉनची ही गोष्ट आहे छोटीशीच पण थेट मनाला जाऊन भिडते.

    दोन दशकांच्या वेगवेगळ्या काळपट्टयावर चालणारी ह्या पत्रांची गोष्ट आपल्याला ज्यांची ही पत्रे असतात त्या वेगवेगळ्या पात्रांनाही भेटवते. एक वेगळ्याच पद्धतीने गुंफलेल्या या वेगवेगळ्या पात्रकथा, ‘न पोहोचवलेल्या’ पत्रांच्या धाग्याने छान घट्ट विणलेली आहे. एखाद्या निवांत सुट्टीच्या दिवशी हे पुस्तक हाती घेतलं तर एक बैठकीतच तुम्ही संपवूनच खाली ठेवाल. अगदी छोटेखानी असलेलं पुस्तक आपल्या अगदी साध्या मुखपृष्ठानी तुम्हाला नक्की खुणावून घेईल यात शंका नाही.

    पु ल देशपांडे म्हटले होते की “पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली तुमची मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल”. जणू हीच भावना मनात ठेवून जे आल्कमनी प्रत्येक व्यक्तिरेखेला कोणती न कोणती कला दिली आहे. चित्रकला, लेखन, संगीत अशा अनेक कला आणि त्या जोपासणारे कलाकार निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या रुपात आल्कमनि अप्रतिम गुंफल्या आहेत. आल्कमची साधी सोपी भाषा दोन वेगवेगळ्या काळपट्ट्यांची गुंफण या पुस्तकाला एक वेगळाच रंग देतं.

    अरॉन त्याला सापडलेली पत्र पोहोचवतो का? पत्र मिळाल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असते? सारा ज्या पत्राची वाट आतुरतेने कित्येक वर्ष पाहत असते ते तिला मिळते का? या साऱ्याची उत्तरं या पुस्तकात दडली आहेत. तेव्हा नक्कीच तुम्ही हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा.

    My rating: 4/5

    Kindle version
    Publisher: Westland Publications Ltd.
    Language: English

  • सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या संध्याकाळी “आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते” असे उद्गार काढणाऱ्या सुषमा स्वराजजींना अखेरची चाहूल लागली होती का काय अशीही शंका मनात येते.

    आज ज्या भावना या बातमीनंतर मनात दाटून येत आहेत त्या भावना आजच्या जगात कोणत्या राजकीय नेत्यासाठी येतील असे मला व्यक्तीशः वाटत नाही. सुष्मजींची राजकीय कारकीर्द जवळून पहिली म्हणणेच काय पण गेल्या सरकारच्या काळात त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाची कारकिर्दही खूप अभ्यासली असेही मी म्हणणे धडधडीत खोटे ठरेल . पण ज्या काही थोड्याफार वेळेला या महान स्त्रीच्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेतला त्यावेळी मन भरून आलं यात शंका नाही मग ती भाषा कोणतीही असो. हिंदी, इंग्रजी इतकेच काय, मध्यंतरी युट्युबवर त्यांचे एक संस्कृत बद्दलचे भाषणही ऐकले होते तेही तितकेच ओजस्वी होते. त्यांचे लोकसभेतील वाक्पटूत्व पाहतांना जाणवणारी मुद्देसूदता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा संयुक्त राष्ट्र संघात बोलतांना दिसून येणारी मुरब्बी मुत्सद्देगिरी खूप प्रेरक आणि आकर्षक होती. स्वच्छ पोशाख, कायम प्रसन्न हास्य असलेला चेहरा, यासह सुषमाजींचे दर्शन झाले की त्यांच्याभोवती कायम एक वलय असल्यासारखे वाटायचे. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिलं की एक ममत्व जाणवत, वाटतं कधीही एक आश्वासक हात पुढे येईल. पण ते आश्वासक हास्य आता भारतीयांपासून दूर गेलं.

    आजवर इतक्या उशिरा रात्री मी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर केलेली नाही पण आजच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याशिवाय झोप लागणार नाही याची मला खात्री आहे. या दीपस्तंभाला दिशादर्शक म्हणून ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल….

  • सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा

    सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा

    64928228_649939798807717_2966049533824095172_nचक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातील हुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी खरं सांगायचं तर कथानकातील ज्या क्षणाला त्यांनी पहिला सिझन थांबवला आहे तो पाहून झाला की तुमची अक्षरशः चिडचिड होते. अरे ही काय जागा आहे का कथानक थांबवायची? पण नाही, प्रेक्षकांना चक्क्यासारखं टांगून ठेवायचं हा जणू चंगच बांधला होता. एक तर हा असा शेवट हाच मुळी सगळ्यात मोठा धक्का होता. आपण जो बघतोय तो सिझन १ आहे, याची शून्य कल्पना देऊन जो काय डाव टाकला होता तो इतका चपखल बसलाय की विचारता सोय नाही. मागे म्हटलं होतं, की जेव्हा ही सिरीज संपेल तेव्हा नंतर के बघायचं हा प्रश्न पडणार आहे, पण हा क्लिफ हँगर आला आणि तो प्रश्न, “काय बघायचं?” वरून, “याच्या पुढं काय?” यावर येऊन थांबला.

    हुतात्मा सिझन २ चे प्रेरणादायक ट्रेलर पहा

    पण सुदैवानं ZEE5 ने याच उत्तर वर्षभराची वाट न पाहायला लावता आत्ताच दिलं आहे. नुकताच “हुतात्मा सिझन २” ची झलक ZEE5 वर प्रदर्शित झाली आहे. आणि पहिल्या सिझन मध्ये जी काही उत्सुकता निर्माण झाली होती ती आता शिगेला पोहोचली आहे. सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते ही पंचमहाभूते आपल्या मानगुटीवर बसण्यास पुन्हा एकदा तयार आहेत. अंजली पाटील साकारत आहेत ती नायिका विद्युत हिचे पात्र काही नवीनच वळणे घेत साऱ्या प्रेक्षकांना धक्के द्यायला सज्ज आहे.

    मुंबई ईलाख्यामधून भाषिक प्रांतरचना करताना निर्माण झालेल्या स्वतंत्र भारतातील एका मोठ्ठया पेचातून ऊभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोठ्या खुबीने पहिल्या सिझन मध्ये जयप्रद देसाईंनी उभी केली. पहिली ठिणगी पडली तेव्हापासूनचा सारा प्रवास पहिल्या सिझन मध्ये फार सुदंर रीतीने मांडला आहे. साऱ्या महाराष्ट्रात आपापले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले डावे, उजवे मतप्रवाह साकारणारी पंचमहाभूते जणू या साऱ्या घडामोडींना एका सूत्रात बांधणाऱ्या निवेदाकाचेच काम करत होते. दुसऱ्या सीझनची जी झलक आत्ता बघायला मिळते आहे त्यामध्येही सारीच महाभूते हे सूत्रधार निवेदकाचे काम करत राहतील असेच भासते आहे. 

    64875206_2778987032173072_736997064559168522_n
    विद्युत सामंत (अंजली पाटील)

    १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या घटनेपासून सुरु झालेली ही वेबसिरीज पहिला सिझन संपता संपता येऊन पोहोचते ती प्रतापगडापाशी. १९५७ मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या (क्षितीज झारपकर) पुढाकाराने प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण नेहरूंनी (आरिफ झकारिया) करावे असे ठरले. आणि याच घटनेच्या अवती भोवती, डावे, उजवे, मध्यम असे सारे मतप्रवाह आपली संयुक्त महाराष्ट्राची मागणी घेऊन पोहोचले आहेत. आणि काही तरी थरारक घटना घडणार त्याच नेमक्या क्षणी सिझन संपला आहे. आचार्य अत्रे (आनंद इंगळे), तसेच डाव्या विचारसरणीचे कॉम्रेड डांगे (मनोज कोल्हटकर), एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनात संयुक्त महाराष्ट्र समिती या चळवळीचे नेतृत्व करत होती, पण समाजातील सळसळणाऱ्या तरुण रक्ताच्या कामगार वर्गाची असलेली थोडी धारदार डावी बाजू उभी या मालिकेत अंत्यत दमदारपणे कॉम्रेड अभय सानेंच्या (वैभव तत्ववादी) सोबत उभी असलेली दाखवली आहे.

    65272334_1250264355158571_1087635846770797825_n
    श्रीरंग पत्की – पत्रकार (अभय महाजन)

    या साऱ्या मतमतांतरांचे आपापसातले शह काटशह सुरू असतांनाच संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयावरची साऱ्यांची निष्ठा या साऱ्यातून जे चळवळीचे रसायन जमून आले आहे, ते हुतात्मा सिझन २ मध्ये फार प्रकर्षाने जाणवून येते. एखाद्या आगामी कलाकृतीची इतकी उत्तम झलक क्वचितच पाहायला मिळते. आणि हो, एक नवीन पात्र हुतात्मा सिझन २ मध्ये आपल्या भेटीला येत आहे जे अजूनही गुलदस्त्यातच आहे पण तो आवाज गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका यातून ऐकला आहे. पण मी कोणता आवाज म्हणतोय हे तुम्ही ट्रेलर पहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. पण जर नसेल पहिला तर तुम्ही जर कोणी अजून ट्रेलर पहिला नसेल तर लवकर जरूर पहा. कारण १ जुलै पासून पुन्हा एकदा महाराष्ट्र जन्माच्या कहाणीचा पुढील सिझन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

    ~~~~~

    चित्र सौजन्य – ZEE5 premium

  • चलनी नोटेस…

    चलनी नोटेस…

    सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे,
    तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे.

    पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे,
    कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे.

    वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
    वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे.

    हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
    नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे.

    येई सत्ता, थोडी मत्ता, साथ तुझी जर असे,
    झिंग तुझी जर जादा होता, विवेके गेला दिसे.

    नतमस्तक मी होतो सखये, बघूनी लीला साऱ्या,
    या जगतावर तुझीच चाले, एकछत्री ही माया.

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • द्वंद

    द्वंद

    PicsArt_04-11-07.48.07.jpg

    एक अथक द्वंद्व सुरू आहे माझ्या मनात,
    अगदी अनादी काळापासून,
    हा संघर्ष आहे तुझ्या माझ्यातला,
    कळत नाहीये की तो आहे माझ्याशीच माझा.

    सतत दिसून येतं डावं ऊजवं,
    जणू बसलं आहे लावून स्वताच्याच पाठीला पाठ,
    संवाद तोडून कुढतं कधी मनातल्या मनात.
    कधी कधी जेव्हा डोळे उघडतात,
    तेव्हा विचारावंसं वाटतं,
    हेच द्वंद्व सुरू आहे का तुझ्याही मनात?



    English translation

    ~~~~~

    There’s a tussle in my mind,
    Continuing since eternity,
    Tussle’s between you and me,
    Or is it, me versus me?

    I witness right and left
    sitting back to back all the time,
    Looking inward, immersed in silence.
    But whenever I open my eyes,
    I always wanted to ask,
    Is the same tussle is troubling you?


    Painting artist Snehal Ekbote.