Category: ललित

  • सापडले….

    लहान मुल, निरागस, मनमोकळ, हसणारं, इकडे तिकडे मनसोक्त भटकत आनंदी आयुष्य जगणारे. काळाबरोबर मोठे होऊ लागते आणि ते चेहेर्यावरचा हसू कुठे तरी न सांगता निघून जाते. शांतपणे. मग अचानक कधीतरी निवांत क्षणी मागील आठवणी दाटून येतात आणि मग अचानक लक्षात येतं किती काळ लोटलाय आपण मनमोकळे हसलोच नाहीये. अधिकाराच्या बुरख्याखाली कुठे तरी आपण स्वतःची ओळख विसरून गेलोय. स्वतःच्या घरात बायकोच्या हातचा जेवताना, मुलांच्या यशाकडे प्रगतीकडे बघताना, आई वडिलांची सेवा करताना देखील तो अधिकारी नावाचा बुरखा अंगावरून उतरत नाही. जणू घट्ट गोंद लावून चिकटवून टाकला आहे. कुठे एखादा चांगला विनोद ऐकला तरी चेहेऱ्यावरची माशी उडत नाही. चांगलं गाणं ऐकलं तर मनमोकळी दाद देता येत नाही. जणू कोणताही आनंद उपभोगणच जणू आपण विसरून गेलोय. एकाच विचार मनात येतो आपण असा वागलो तर लोक काय म्हणतील. या अवाजवी लोकलाजेस्तव आपल्याला कळतच नाही की आपण किती आनंदाचे अनमोल क्षण वाया घालवले.

    मग अचानक कधीतरी जुने फोटो सापडतात, एखाद्या जुन्या गाण्याच्या ओळी कानी येतात आणि त्या सगळ्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य हसऱ्या आठवणी आपल्या भोवती गलका करतात. आपण नको म्हणत असताही हात घालून तो साहेबी अंगरखा टरटरा फाडून टाकतात. आणि हाताला धरून जवळजवळ ओढतच घेऊन जातात आपल्याबरोबर. बराच काळ भटकत बसतो आपण. वेळकाळाचं भान विसरून आपणही त्यांच्याबरोबर हुंदडतो. यथावकाश भटकून झालं कि आठवणीच आपल्याला पुन्हा आणून सोडतात घरी. सोबत देतात एक नवी उमेद. एक अनामिक उर्जा आणि पुन्हा साहेबी मुखवटा न घालण्याची ताकीद….

  • पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..

    गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. मग सुरु झाली ती राष्ट्रकुल स्पर्धांचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी. पाठीशी होता राष्ट्रकुल युवा स्पर्धांचा दांडगा (?) अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच?) आणि भल्या मोठ्ठ्या व्यवस्था नामक गाड्याला गती आली. अर्थात कूर्म गतीच होती ती यात वादच नाही. पण कूर्म का होईना गती तर मिळाली.


    हळू हळू दिवस कमी होत होते. कामांच्या फाईली सरकत होत्या. क्रीडांगणे, राहण्याच्या सदनिका आकाराला (?) येत होत्या. मग अचानक लक्षात आला की दिवस फारच कमी राहिलेत आणि कामा तर हवी तशी संपलीच नाहीत. मग लगेच बैठका झाडल्या. भराभर सूचना गेल्या कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अंतिम मुदती सुधारून ठरवण्यात आल्या. मात्र कामगार आणि पैसा मात्र काही वाढला नाही. परिणामस्वरूप कामे उरकायच्या मागे मंडळी लागली. दिवस जवळ येत होते तसे कामे आकाराला येताना आता किमान दिसत होती. पण शेवटी भारत देशात जे होणे तेच झाले. लक्षात असे आले की अरे पुढचे प्रवेशद्वार तर मस्त सजलंय पण बाकी दारांना मात्र अजून गीलावाच झाला नाहीये. म्हणजे सौंदर्य स्थळे तर उत्तम सजली पण आवश्यक सोयी सुविधा, क्रीडांगणे खेळांसाठी तर तयारच झाली नाहीयेत. परदेशी खेळाडूंच्या राहण्याच्या जागा अजून बऱ्याच अपूर्ण आहेत. पुन्हा एकदा बैठका झाल्या, मंत्री गट, अधिकारी गटांच्या भेटी झाल्या. पाहण्या झाल्या. पुन्हा सुधारित मुदती आल्या. थोड्या प्रमाणात साधनसामुग्रीत वाढ झाली. पुन्हा कामे नेटानी सुरु झाली.


    अचानक एके सकाळी लोकांनी त्यांचे दूरदर्शन साचा चालू केला तर बातमी झळकली की राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मग पुन्हा तीच नेहमीच्या घटना सुरु झाल्या. चौकशी समिती, मंत्र्यांच्या बैठका आणि बरेच काही. कलमाडी साहेब आपले छातीठोकपणे सांगत होते की असे काही नाही झालेले सारे काही आलबेल आहे. सर्व तयारी नियोजनानुसार चालू आहे आणि या स्पर्धा यशस्वी होणार आहेत. पण बिचार्यांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच होत नाही. त्यातच भारताचे परम मित्र भारतातील हस्तकांना हाताशी धरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात. नेहमीच्याच साधनांनी हो. बॉम्बस्फोट आणि परदेशी नागरिकांवर गोळीबाराच्या घटना स्पर्धा स्थळा जवळ होतात आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघटना सुरक्षेच्या परीक्षणासाठी डेरेदाखल होतात.


    इतका सगळा झालेला की कमी होतं तर स्पर्धांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळतो. त्याच दुपारी भारत्तोलन; म्हणजेच मराठीत वेटलिफ्टिंग हो; ज्या ठिकाणी होणार त्या सभागृहाचे छत कोसळते. आणि समोर येतो तो बांधकाम या बाबतीतला हलगर्जीपणा आणि स्पर्धांच्या अगदी १० दिवस आधीपर्यंत अपूर्ण असलेली खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणची गैरसोय. अनेक सदनिका अर्धवट झाल्यात, स्वच्छतेच्या नावानी आनंदी आनंदच आहे. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पान तंबाखूच्या पीचकाऱ्यांची नक्षी सगळ्या सदनिकांमध्ये काढली आहे. गाद्यांवाराच्या चादरी तर कोणे एकेकाळी पांढऱ्या असतील अशा जाणवत होत्या. त्यावर बरेच डाग पडलेले होते.
    दरम्यानच्या काळात निसर्गानी पण आपले हात साफ करून घेतले. आयतीच सारी माणसे कोंडीत सापडलेली त्याला. धुंवाधार पाऊस पडला आणि दिल्लीत कधी नव्हे तो भला थोरला पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.पुन्हा एकदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभा करायला क्रीडानागरीतला कोराकार्करीत रस्ता पार खचून गेला. सदनिकांमध्ये पाणी साचलं, दिल्लीत डेंग्यूची साथ पसरली. हि सगळी वृत्ते परदेशी वृत्तामाध्यामांतून प्रसिद्ध झाली आणि अनेक अग्रमानांकित खेळाडूंनी स्पर्धेतून माघार जाहीर केली. इतकं सगळं झालं तेवा कुठे पंतप्रधानांनी मध्ये हस्तक्षेप करून बैठक घेतली, स्वच्छतेचा, सुरक्षेचा, अपुर्या कामांचा सगळ्या बाबींचा आढावा घेतला. आणि बाकीची कामे २४ ते ४८ तासात पूर्ण करायला सांगितली.


    आता मला सांगा जे इतक्या वर्षात जमला नाही ते १-२ दिवसात होणारे का? आणि इतकं सगळं झालं तरी कलमाडी साहेब आपले तेच पालुपद लावून आहेत. “सारे काही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे, स्पर्धा नक्की यशस्वी होणार.” नाही म्हणायला राष्ट्रकुल स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी थोडा अनुकूल विचार मांडलाय; तयारी समाधानकारक आहे म्हणून. पण एकंदरीत परिस्थिती आणि वृत्ते बघता सामान्य जनतेचे मत तर ठाम झालंय. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे आणि या सगळ्यांनी आपापली खा ती उत्तम सांभाळून देशाची शान जगात पार धुळीला मिळवली आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे “बघा बघा बघा सगळी कामे नित चालू आहेत. १-२ दिवसात बाकी कामे संपतील…आम्ही कितीही जोरात पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…”

  • चला मंडळी राम राम….

    बरंय भक्त मंडळींनो, दहा दिवस कसे गेले कळलंच नाही न? हे दहा दिवस मी तुमच्याबरोबर खूप मजेत घालवतो दर वर्षी. नेहमी वाटत; तुम्हाला सोडून जाऊ नये. पण काय करणार? येतानाच नवा मोबाईल घेतलाय नं. मिस कॉल्सचा पाऊस पडेल हो लगेच त्यावर. इथे काय किंवा स्वर्गात काय, घरची मंडळी सगळी सारखीच!!!


    तुम्हा अबालवृद्धांचा उत्साह पहिला की खूप बरं वाटत. जाणवतं, आहे; या भौतिक जगात अजून थोडी अध्यात्मिकता आहे. या दहा दिवसांत काय काय मजा करता ते तुम्ही, आणि मी मात्र आपला एका जागी बासून असतो. कधी कधी पार कंटाळून जातो, पण काय करणार? “आलीय भोगासी असावे सादर….” इथे बसल्या बसल्याच एन्जोय करतो आपला. एकटाच…..


    मी असं ऐकलय की तुम्ही महिनाभर आधीपासून कामाला लागता? ते पण दिवसरात्र एक करून आणि स्वतःचे नोकरी-धंदे सांभाळून. दमत नाही का तुम्ही लोकं? कधी कधी थोडे दिवस आधीच यावंसं वाटतं; तुमच्या बरोबर कामं करायला. पण काय करू? हाय कमांड सुट्ट्याच देत नाही नं, रेशनिंग आहे सुट्ट्यांच!!!! सुट्टी मोजून दहा दिवस. असो… हे दहा दिवस तरी मिळतात यातच समाधान..


    सध्याच्या दिवसात तुम्ही माझ्या निमित्तानी का होईना, चार चांगली कामं करता ते बघून फार बरं वाटत. कुणी अनाथांना, अंध-अपंगांना मदत करतं, तर कुणी निसर्गानी झोडपलेल्यांना. खरंच लोकमान्न्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. काही नाठाळ मंडळी असतातच, गर्दीचा फायदा घेणारी, लोकांना लुबाडणारी. फार राग येतो तेव्हा, पण शिक्षा करता येत नाही नं. शस्त्र सगळी घरीच असतात. आपल्या माणसांत हवीत कशाला शस्त्र? म्हणून घरीच ठेवतो. हातावर हात ठेवून बघत बसावं लागतं. मग आम्हीपण आमच्या ऑर्गनाईझर मध्ये नोंदून ठेवतो शिक्षांची यादी, घरी गेल्यावर उरकायची कामे म्हणून.


    काही गोष्टी मात्र नाही आवडत हं तुमच्या आजीबात मला. केवढा थर्माकोल अन प्लास्टिक वापरता तुम्ही लोकं आरास करायला! अहो तुम्हालाच त्रास होणारे त्याचा. अहो तो थर्माकोल तयार करताना तुमचा ओझोन खराब होतो नं. भोकं पडतात त्याला. आणि काय तो टेप अन चा आवाज, बापरे; अजून काही दिवस राहिलो तर नक्कीच ठार बहिरा होईन. तुम्हाला नाहीका त्रास होत? अहो आणि तुमच्या आजूबाजूला सगळेच ठणठणीत नसतात. आजारी लोकांना त्रास होतो इतक्या मोठ्या आवाजाचा. जरा काळजी घ्या त्यांची सुद्धा. तेवा या गोष्टींवरचा खर्च कमी करून आसपासच्या लोकांसाठी काही स्पर्धा ठेवा. स्थानिक कलाकारांना वाव द्या. त्यासाठी मी कमी प्रकाशात राहीन. कमी गाणी ऐकीन, मला चालेल. चालेल कसलं पळेल. मलाही त्रास होतोच की आवाजाचा. आणि असेही तुम्ही लावता ती गाणी मला आजीबात आवडत नाहीत… अरे काही अर्थातरी असतो का त्यांना?


    यावर लेक्चर देत बसलो तर उशीर होईल. निघायला हवे आता. परत एक मिस कॉल आला बघा घरून. फक्त शेवटी सांगितलं ते लक्ष ठेवा हं. मग काय भेटूच पुढच्या वर्षित. पुन्हा तीच धमाल, तीच मजा. तोपर्यंत..
    राम राम…..

  • पाणी : निसर्गाची अमूल्य देणगी…..

    आज बऱ्याच दिवसांनी काही लिहिण्याची इच्छा झाली, आत्ताच फेसबुक वर एक चित्रफित बघितली. सध्याच्या म्हणजे दर उन्हाळ्यात सगळी कडे भेडसावाणाऱ्या पाण्याच्या समस्ये बाबत असलेली ती चित्रफित बघून अक्षरशः मन विचारप्रवृत्त झालं आणि सरळ कागद समोर ओढून हे शब्द उतरवू लागलोय. पाणी; निसर्गाची मानवाला मिळालेली एक अमूल्य देणगी. पाणी म्हटलं कि समोर येते ती खळखळत वाहणारी नदी, अथवा डोंगराच्या कुशीतून नितळ पाणी घेऊन येणारा अवखळ झरा, आणि लांब लांब पसरलेला अथांग समुद्र. या पैकी सध्या आपण पिण्या योग्य पाण्याचाच विचार करावा. खर तर निसर्गानी भरभरून दिलेली ही देणगी आपण स्वतःच्या हातांनी उधळून उधळून पार संपवून टाकली आहे. म्हणून तर आज आपल्याला दुष्काळाच्या इतक्या भयानक परिस्थितीला तोंड द्यावा लागतं आहे. आजकाल तर हा प्रश्न इतका भयानक झाला आहे की जानेवारी फेब्रुवारीतच पाणी टंचाईची लक्षणं दिसू लागतात. विहिरी तळ गाठतात, नाले कोरडे पडतात, नदीपात्रातील वाळू दिसू लागते. आणि एक भयानक चिंता भेडसावू लागते, पाऊस पडेपर्यंत पाणी कसे पुरणार. मग सगळी जनता सरकारकडे नजरा लावून बसते जणू सरकार पाऊसच पडणार आहे. जर पाणीच नाहीये ते लोक तरी काय करणार, त्यांच्या हातात पण एकाच उपाय शिल्लक असतो – पाणीकपात. मग सुरुवातीला आठवड्यातून एकदा असलेली पाणीकपात तापत्या उन्हाबरोबर वाढत जाते आणि एक दिवसाआड पाणी मिळणं सुरु होतं. या वेळापर्यंत माध्यमांमधून मधे मधे पाणी टंचाई बद्दल अनेकानेक लेख आलेले असतात, बऱ्याच चार्चासत्रांची नोंद झालेली असते. सगळेच जण म्हणत असतात की या वेळी पाणी टंचाई आहे. पुढल्या वर्षी पाऊस झाल्यावर पाण्याचे नीट नियोजन करून परत अशी टंचाई येणार नाही अशी सोय करू. पण पुढल्या वर्षीही हिच परिस्थिती परत हजेरी लावणार.

    इतकं सगळं झाला तरीपण शहरी भागात फारसा फरक पडत नाही. पण खेड्या पाड्यात मात्र फेब्रुवारीतच वणवण सुरु होते. कित्येक किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हंड्या कळश्या एकावर एक रचून बायका अनवाणी पाणी आणत असतानाचे चित्र उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच दिसू लागते. कित्त्येक गावांना बाहेरून वाहनांमधून पाणी पुरवावे लागते. या सगळ्याला मे पर्यंत तर इतकी मागणी येते की गावांना पाठवायला वाहनं कमी पडतात. मग फक्त पाण्यावरून मारामाऱ्याच होणे बाकी असते. कधी कधी तर अशी वेळ येते की सगळे गावच्या गाव ओस पडते पाणी नाही म्हणून. पाणी नाही म्हणून अन्न पण नाही. जनावरांना चारा नाही. कधी कधी अन्न पाण्याशिवाय मृत्यू आलेल्या जनावरांचे आकडे येतात, एखादा फोटो असतो. ते पाहिलं, वाचालं की काळीज तेवढ्यापुरतं हेलावतं आणि आपण पान उलटून पुढे जातो.

    ह्या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीतही अनेकानेक नवीन अम्युझमेंट पार्क्स निघत आहेत ज्यात अनेक ठिकाणी भरमसाठ पाणी वापरलं जातंय. नवनवीन मोठे मोठे स्नो वल्ड निघतात ज्यात खंडीभर बर्फ बनवून वापरला जातोय तो फक्त शहरातील काही निवडक वर्गासाठी जो या सगळ्या गोष्टींसाठी पैसा देऊ शकतो. वर उल्लेख केलेल्या चित्रफितीमध्ये अशाच एका ठिकाणी काही लोकांना विचारला तर त्यांचा सूर असाच होतं की आम्हाला अशा परिस्थितीची जाणीवही नाहीये, आणि “पाणी वाचवा” सारख्या गोष्टी फक्त टेलिव्हिजन वरच चांगल्या दिसतात. त्यानुसार वागणं अशक्य आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत पण असे नाहीये की या सगळ्या गोष्टी बंद करा. त्या असू देत पण त्या सगळ्याचा आनंद घेताना किमान हे भान तर ठेवा की आपल्याच देशात अशी परिस्थिती सुद्धा आहे.

    पाणी जिरवण्यासाठी आणि जमिनीतील पाणी वाढवण्यासाठी आपल्या शहरी लोकांकडे एक छान उपाय आहे. घरावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून ते जमिनीत जिरवणे, अथवा साठवणे. सगळी रचन तयार करण्यात थोडा पैसा खर्च होईल पण ते कारण आता आवश्यक बाब झाली आहे. नवीन इमारतींना तर त्याशिवाय परवानगीच मिळत नाही. पण जुन्या इमारतींनी पण ही रचन करून घेणे खूप योग्य आहे. किमान आपल्या स्वतःच्या घराच्या पाण्याची तर सोय होईल, असा विचार करून जरी हा पैसा खर्च केला तरी धरणांमधील पाणी वाचेल आणि ते इथर ठिकाणी पोहोचवता येईल. हा एक उत्तम उपाय सध्या प्रचलित होतोय. याचा जास्तीत जास्त प्रसार आणि वापर कारण आता काळाची गरज आहे असा म्हटलं तरी वावगे ठरणार नाही कारण असा काही जिवावरचा संकट आल्याशिवाय आपण काही करत नाही. शिवाय जर शक्य असेल तर ज्या जलसंवर्धन योजना बिगरसरकारी संस्थांतर्फे राबवल्या जातात त्यात सहभागी व्हा, त्यांना अर्थ साहाय्य द्या.

    इतकाच काय, आपण आपल्या लहान लहान कृतींमधून पण बरेच पाणी वाचवू शकतो. या कृती अक्षरशः इतक्या लहान सहन आहेत की आपल्या लक्षात पण येत नाही की आपण या सगळ्यात पाणी वाया घालवतोय. उदाहरणार्थ गाडी धुणे, गाडी धुतांना सामान्यतः आपण नळी लावून धुतो पण त्याच ऐवजी एखाद्या बादलीत पाणी घेऊन फडक्यांनी व्यवस्थित पुसले तर एक बादलीभर पाण्यात नक्कीच गाडी झकास चमकून निघेल. तसेच अंघोळ करताना शोवरनी करण्या ऐवजी बादलिनी करावी. जेणेकरून आवश्यक तितकेच पाणी वापरले जाईल. दात घासताना, दाढी करताना कित्येक लोकांना नळ चालू ठेवण्याची सवय असते. ते टाळले पाहिजे. शिवाय सगळ्यात पहिली गोष्ट तर घरातले गळके नळ लगेच दुरुस्त केले पाहिजेत अथवा बदलावेत. कुठे पाणी वाहत असेल तर बंद करावे. शेजारी जर पाण्याची टाकी वाहत असेल तर किमान त्यांना सांगावे की टाकी भरली आहे बंद करा. अर्थात ऐकणे न ऐकणे त्यांचे काम. पण आपण निदान सांगावे तरी. या सगळ्या सध्या सध्या गोष्टींवर जरी लक्ष दिलं गेलं तरी खूप पाणी वाचेल.

    मित्रांनो, प्रत्येक समस्येकडे सरकारकडे बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः काम केले, आपल्या जीवनशैलीत बदल केले तर असे बरेच प्रश्न आपले आपणच सोडवू शकू बरोबर की नाही???

  • वर्षाऋतू …..ऋतू नवजीवनाचा…..

    उन्हाळ्याचा शेवट…मे महिन्याचे शेवटचे दिवस. सगळीकडे नुसत्या सुकाल्याच्या खुणा पसरलेल्या. भेगाळलेली जमीन, झाडे जणू जळून गेलेली, गवत वळून सोने झालेले, प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी वणवण चालू. लोक पंख्याकडे बघत उकाडा दूर न केल्याबद्दल त्याला दोष देत घामाघूम होतायत. सूर्य तर केवळ जणू जगाला भाजून काढण्यासाठीच तळपतोय. सगळेच लोक घामेजून पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शोधात आहेत. कुत्री मांजरांसारखी जनावर तर सार्वजनिक नळातून गळणाऱ्या एकेका थेंबावर तुटून पडतात. झरे, ओहाळ, नद्या-नाले पार आटून गेलेत. जगातील सगळ्यात बुद्धिमान समजणाऱ्या प्राण्यांनी बनवलेले सगळे पाणीसाठे खोल गेलेत. आणि बिचारा काहीच करू शकत नाही. नाइलाजानी  पाणीकपात जाहीर झालीये. थोडक्यात सगळीकडे औदासीन्य पसरलं आहे आणि सगळे फक्त आकाशाकडे डोळे लावून त्या काळ्या मेघाची प्रतीक्षा करत आहेत. आणि तो मात्र क्षितिजावरही साध दर्शनसुद्धा देण्याचे कष्ट घेत नाही. कायम सगळ्यांपासून लपत, लांब जात, चिडवत असतो. अजून आतुरतेने वाट बघायला भाग पडतो.

    “अरे तो आला रे!!!!!!!!!!!! तो बघा तिथे….” ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते त्या काळ्या ढगाला दूर क्षितिजावर बघून सगळे उल्हासीत झाले. पण थोड्याच वेळात निराशेच्या निश्वासांशिवाय काहीच उरले नाही….मेघ जणू लपाछपी खेळल्या सारखा हुलकावणी देऊन दूर कुठेतरी निघून गेला.सगळे आपले नशिबाला दोष देत बसले. त्याशिवाय त्यांच्या हातात होते तरी काय? पण थोड्याच दिवसात श्री. मेघ आले आणि या वेळी सगळ्या कुटुंब काबिल्यासकट आले आणि चांगले ३-४ महिने मुक्कामाच्या तयारीनेच आले. सगळ्या कुटुंबाला बघून सगळेच आनंदी झाले. झटक्यात वातावरण बदलले सगळीकडे उत्साह संचरला. थंड वारे वाहू लागले. सगळे आकाश व्यापून मेघ कुटुंबीयांनी पृथ्वीवासियांसाठी सावली धरली. त्यांच्या मागे गेलेला  सूर्य आपले साम्राज्य धुळीला मिळाल्याने निराश झालेला दिसत होता. श्री. मेघांनी त्याचे साम्राज्य हस्तगत केले. भेगाळलेली कोरडी जमीन आता अजून भेगांचा त्रास नाही असा विचार करत होती तर प्राणी अन्नपाण्याची वणवण संपेल या विचारात. माणसे आदल्या दिवशीच्या पाणी कपातीमुळे रिकाम्या असलेल्या नळांना पाणी कधी येईल याची वाट आता बघायची नाही या विचारात. सगळेच जण आता सम्राट मेघ पृथ्वीवर जीवनाचा पहिला थेंब कधी पडतात याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. आणि अखेर तो क्षण आला, मेघांच्या गर्जना सुरु झाल्या जणू ते सगळ्या जनतेला ओरडून सांगत आहेत, “आम्ही आपल्या मागण्या ऐकल्या, साम्राज्य हाती घेतल्यावरची पहिली घोषणा आम्ही करत आहोत. प्रजाजनहो, लवकरच आम्ही आपल्यावर पर्जन्यवृष्टी करून आपणाला उपकृत करू.”

    आणि घोषणा झाल्यावर अगदी थोड्याच कालावधीत, दिलेल्या आश्वासनानुसार सम्राटानी पृथ्वीवर जीवनाचा सडा पडायला सुरुवात केली. ज्याच्यासाठी ही पृथ्वी आसुसली होती तो पर्जन्यवर्षाव  होत होता. सगळे प्रजाजन खुश झाले. झाडे जणू प्रदीर्घ आणि शांत झोपेतून उठल्यासारखे ताजेतवाने झाली. आपल्या भेगांच्या जखमा आता भरल्या जाणार या विचारांनी जमीन कोण आनंदात होती. इतकी कि लगेच तिनी हिरवागार शालू नेसून आनंद व्यक्त सुद्धा करून दाखवला. झरे, ओहाळ डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उसळ्या मारत आपला आनंद व्यक्त करत होते. नद्या आनंदानी दुथड्या भरून जीवन वितरणाचे आपले कार्य पार पाडण्यासाठी वेगात धावत होत्या. तहानलेले सारे जीव आपली तहान त्या मधुर पाण्यानी शांत करत होते. सम्राट मेघांच्या साम्राज्यातील सगळे प्रजाजन सुखी होते आणि सम्राटाच्या दीर्घ कारकिर्दीची मनोमन कामना करत होते…..

  • लोकशाहीतली दडपशाही………

          नमस्कार….

          सध्या दर आठवड्यात नवीन बातमी येते… अमुक चित्रपटाचे प्रदर्शन तमुक पक्षानी रोखले… तमुक चित्रपटाला अमक्या अमक्या नेत्याचा आक्षेप.. आज ह्या संघटनेनी चित्रपटातील या भागावर आक्षेप घेतला.. अरे काय चाललाय काय??? भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कि नाही??? चित्रपटात जर काही वाईट असेल तर त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी सेन्सोर बोर्ड बसवला आहे नं??? मग ह्यांना कशाबद्दल तक्रार आहे??? अगदीच काही आक्षेपार्ह आहे जसे राष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारी काही दृश्य आहेत, अथवा सामाजिक नितीमत्तेला अडथळा ठरतील असे काही आहे. तर ठीक आहे कि.. पण तसे नसतांना हे  आक्षेप घेतले जातात. नाही घेतले तर त्यांच्याच अस्मितेला धक्का बसेल ना… अहो चित्रपटाच्या नावात एक सर्वसामान्य माणसाच्या तोंडी अगदी एखाद्या नेहमीच्या शब्दासारखी असलेली शिवी आलीच; जिला लोकांचा काहीच आक्षेप नाही हा; उगीच एखादी संघटना उठते आणि विरोध करते. इतकीच शिवराळ भाषेबद्दल तिडीक असेल तर त्यांनी किमान १ महिना तर सोडा पण १ आठवडा एक पण शिवी तोंडातून ना काढता राहून दाखवावं. अशक्य आहे. चीड आली कि पहिले शिवीच बाहेर पडते ना? मग त्या चित्रपटातून सध्याच्या शिक्षणपद्धाती बद्दलची चीड तर दाखवायची होती.  मग त्यांनी काय वापरावा नावात अशी त्यांची अपेक्षा होती? शिक्षणाचा उदो उदो???

         आज काय तर म्हणे आम्ही माय नेम इज खान नाही दाखवू देणार. त्या आधी सगळ्यांनी शिवाजी राजे भोसले बोलतोय बघावा.. अरे ह्यात काय तर्कसंगती आहे??? शिवाजी राजे आधीच सगळ्यांचा बघून झाला आहे की. आणि कोणत्या गोष्टींची तुलना करताय??? माय नेम इज खान काय  अफझलखानावरचा  चित्रपट आहे की शाहिस्तेखानावरचा की ज्याची तुलना “मी शिवाजी राजे भोसले बोलतो आहे” शी व्हावी? का त्यात सांगितलं आहे की महाराष्ट्रात जा आणि सगळ्या मराठी लोकांना भारताबाहेर हाकलून द्या? अरे कशालापण विरोध करायचा का? नशीब त्या हरीश्न्द्राच्या निर्मितीकथेचं नाहीतर एखादा दादासाहेबांचा वारस उठून त्याला ऑस्कर मध्ये पोहोचवण्याच्या आधीच खाली ओढून घेऊन आला असतं. कारण दिला असतं दादासाहेबांचे केस उजवीकडे जास्त होते. अश्या क्षुल्लक कारणांसाठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवितात. दंगा करतात, तोडफोड करतात. पण हे  लोक विसरून जातात की आपण जे मोडतो ते सरकार आपल्याच पैश्यातून भरून काढणार आहे… ते थोडीच स्वतःचे पैसे टाकणारेत.

           अजून एक खूळ निघालं आहे. सरकार म्हणत आम्ही चित्रपटगृहांना पोलीस संरक्षण देऊ. आता मला सांगा, कोण शहाणा माणूस इतक्या पहाऱ्यात थेटरात जाईल? त्याला काय हौस आहे पैसे खर्चून डोक्याला ताप करून घ्यायची?? तो गप घरी सी डी आणून नाही बघणार?? म्हणजे तुमच्या विरोध वगैरेचा काही उपयोग झाला का?? लोकांनी बघायचा तो बघितलाच की… उगीच आपली शक्ती वाया घालवायची आणि दहशत निर्माण करून सामान्य लोकांना त्रास द्यायचा. जेणेकरून या लोकशाहीत लोक आपल्या नावानी दडपून जातील. मग आपल्याला मोकळा रान मिळेल नको ते उद्योग करायला…. हे काय एखाद्या पक्षाचे नाही… सगळेच पक्ष इथून तिथून सारखेच आहेत. जो तो लोकांना दडपायला बघतो आहे. असं वाटत या लोकशाही पेक्षा दडपशाहीच बरी होती. इथे नुसतीच नावाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, पण जरा कोणी काही मोठ्या नेत्याबद्दल बोलला की त्याचा खूनच काय तो व्हायचा बाकी उरतो… अरे कुठे आग असल्याशिवाय धूर निघत नाही न??? नेते मंडळीनी छान वागा तुम्हाला कशाला विरोध करायची वेळच येणार नाही न.