Adi's Journal

Pieces of my thourhgs

बऱ्याच वर्षांनंतर

खूप वर्षानंतर अचानक फेसबुक वर पुन्हा भेट व्हावी आणि मैत्रीचे नाते पुनश्च बहारावे असा अनुभव खूप लोकांना आला असेल. माझ्यासाठी हा अनुभव खूप खास. तशी आमची ओळख प्राथमिक शाळेतली. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. अर्थात साहजिकच आहे म्हणा, १५ वर्षांनी पुन्हा बोलणं होत होतं. बऱ्याच वर्षांच्या साचलेल्या आठवणींना पाझर फुटला आणि मनाचे धागे जुळत गेले.

रोज गप्पा होऊ लागल्या, नेटवर, मोबाईलवर. १५ वर्षांचे अंतर दिवसांमध्ये कापले गेले आणि कधीही दुरावले नसल्यासारखे घट्ट नाते निर्माण झाले. आता गावी जाणे झाले की कोणी भेटो न भेटो ही एक भेट निश्चित असते. आणि भेटल्यावर घड्याळाला फाटा असतो. तेजू, आज कोणाचाही विश्वास बसणार नाही कि आपण एकमेकांना १५ वर्षानंतर परत भेटलोय. प्राथमिक शाळेत कसे दिसायचो हे देखील आता आठवत नाही. आठवतात ती फक्त नावं आणि शाळेतली धमाल.

दोघेही दिवसभर कामात गुंतलो तरी ख्याली खुशाली घेतल्याशिवाय चैन नं पडणारे आपण, काही निरोप नाही आला तर सारखे फोने उघडून बघतो नाही का? दिवसभराची रोजनिशी वाचण्याच्या गप्पा आपण कधी मारल्याच नाहीत. रेल्वे रूळ बदलणार नाही इतक्या सटासट आपल्या गप्पांचे विषय बदलतात. विषयाचे बंधन नसलेल्या गप्पा रंगतात त्या फक्त तुझ्याबरोबर. या रंगलेल्या गप्पा निश्चितच आपल्या अंतापर्यंत अशाच चालू राहतील…

Related Posts

Leave a Reply