Category: ललित

  • A negative neon

    A negative neon

    PicsArt_08-29-02.06.38I am reading this very interesting book by an Austrelian – Kashmiri food writer turned author, Sarina kamini – “Spirits in a Spice Jar”. It is her memoir of a journey of rediscovering her roots. It says for Sarina’s Kashmiri family, food is love, love is faith, and faith is family. I reached the point in a book where Sarina is readying herself to once again accept who she is, where her roots are. And she says, 

    “That instead of being known by the sum of all the things that I am, I have become framed by the sum of all the things that I am not. A life scratched in negative neon.”

    These lines hit me hard. In those words, she is explaining her struggle of defining herself with “I am not one of them”. Many a times, in our lives, we tend to define ourselves in exclusionary terms. I am not this, I am not that, We don’t do such things. This generates preconceived bios about the community, race or any social group from which we are excluding ourselves from. It’s ok when we try to exclude ourselves from antisocial elements like thieves, frauds and cons. It won’t create any social strife. 

    However, when we start excluding from our fellow citizens based on particular habit of doing things in a certain way, we saw seeds of descrimination. Even though the criteria of exclusion is as simple and small as use of small amount of sugar / jaggery in savoury dishes. When a child is exposed to such statements very often, it may develop a strong beliefs about that particular point.

    Instead of defining ourselves in terms of “We aren’t like this” or “We don’t do that”, if we start defining in terms of who we are, I believe, we will start developing as an individual as well as society because having a positive identity always helps. It makes you self aware. It creates confidence about talents, good characters and values when we define ourselves based on these things. It is always good to tell “Be like him / her” rather than “Don’t be like him / her.” 

    In the age of social strife and discomfort, this “inclusive identity” will serve as a key to the happy and thriving society. I hardly doubt that there will be anyone who won’t desire for such happy and thriving society. Let’s all start creating this “Inclusive Identity” and wish for happiness…


    Just like 2018, I am taking my blog to the next level with Blogchatter‘s #MyFriendAlexa campaign. My current rank is 5,316,449.

    Hope you enjoy my writings. Feel free to share, comment bellow.

  • सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या संध्याकाळी “आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते” असे उद्गार काढणाऱ्या सुषमा स्वराजजींना अखेरची चाहूल लागली होती का काय अशीही शंका मनात येते.

    आज ज्या भावना या बातमीनंतर मनात दाटून येत आहेत त्या भावना आजच्या जगात कोणत्या राजकीय नेत्यासाठी येतील असे मला व्यक्तीशः वाटत नाही. सुष्मजींची राजकीय कारकीर्द जवळून पहिली म्हणणेच काय पण गेल्या सरकारच्या काळात त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाची कारकिर्दही खूप अभ्यासली असेही मी म्हणणे धडधडीत खोटे ठरेल . पण ज्या काही थोड्याफार वेळेला या महान स्त्रीच्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेतला त्यावेळी मन भरून आलं यात शंका नाही मग ती भाषा कोणतीही असो. हिंदी, इंग्रजी इतकेच काय, मध्यंतरी युट्युबवर त्यांचे एक संस्कृत बद्दलचे भाषणही ऐकले होते तेही तितकेच ओजस्वी होते. त्यांचे लोकसभेतील वाक्पटूत्व पाहतांना जाणवणारी मुद्देसूदता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा संयुक्त राष्ट्र संघात बोलतांना दिसून येणारी मुरब्बी मुत्सद्देगिरी खूप प्रेरक आणि आकर्षक होती. स्वच्छ पोशाख, कायम प्रसन्न हास्य असलेला चेहरा, यासह सुषमाजींचे दर्शन झाले की त्यांच्याभोवती कायम एक वलय असल्यासारखे वाटायचे. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिलं की एक ममत्व जाणवत, वाटतं कधीही एक आश्वासक हात पुढे येईल. पण ते आश्वासक हास्य आता भारतीयांपासून दूर गेलं.

    आजवर इतक्या उशिरा रात्री मी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर केलेली नाही पण आजच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याशिवाय झोप लागणार नाही याची मला खात्री आहे. या दीपस्तंभाला दिशादर्शक म्हणून ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल….

  • सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा

    सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा

    64928228_649939798807717_2966049533824095172_nचक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातील हुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी खरं सांगायचं तर कथानकातील ज्या क्षणाला त्यांनी पहिला सिझन थांबवला आहे तो पाहून झाला की तुमची अक्षरशः चिडचिड होते. अरे ही काय जागा आहे का कथानक थांबवायची? पण नाही, प्रेक्षकांना चक्क्यासारखं टांगून ठेवायचं हा जणू चंगच बांधला होता. एक तर हा असा शेवट हाच मुळी सगळ्यात मोठा धक्का होता. आपण जो बघतोय तो सिझन १ आहे, याची शून्य कल्पना देऊन जो काय डाव टाकला होता तो इतका चपखल बसलाय की विचारता सोय नाही. मागे म्हटलं होतं, की जेव्हा ही सिरीज संपेल तेव्हा नंतर के बघायचं हा प्रश्न पडणार आहे, पण हा क्लिफ हँगर आला आणि तो प्रश्न, “काय बघायचं?” वरून, “याच्या पुढं काय?” यावर येऊन थांबला.

    हुतात्मा सिझन २ चे प्रेरणादायक ट्रेलर पहा

    पण सुदैवानं ZEE5 ने याच उत्तर वर्षभराची वाट न पाहायला लावता आत्ताच दिलं आहे. नुकताच “हुतात्मा सिझन २” ची झलक ZEE5 वर प्रदर्शित झाली आहे. आणि पहिल्या सिझन मध्ये जी काही उत्सुकता निर्माण झाली होती ती आता शिगेला पोहोचली आहे. सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते ही पंचमहाभूते आपल्या मानगुटीवर बसण्यास पुन्हा एकदा तयार आहेत. अंजली पाटील साकारत आहेत ती नायिका विद्युत हिचे पात्र काही नवीनच वळणे घेत साऱ्या प्रेक्षकांना धक्के द्यायला सज्ज आहे.

    मुंबई ईलाख्यामधून भाषिक प्रांतरचना करताना निर्माण झालेल्या स्वतंत्र भारतातील एका मोठ्ठया पेचातून ऊभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोठ्या खुबीने पहिल्या सिझन मध्ये जयप्रद देसाईंनी उभी केली. पहिली ठिणगी पडली तेव्हापासूनचा सारा प्रवास पहिल्या सिझन मध्ये फार सुदंर रीतीने मांडला आहे. साऱ्या महाराष्ट्रात आपापले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले डावे, उजवे मतप्रवाह साकारणारी पंचमहाभूते जणू या साऱ्या घडामोडींना एका सूत्रात बांधणाऱ्या निवेदाकाचेच काम करत होते. दुसऱ्या सीझनची जी झलक आत्ता बघायला मिळते आहे त्यामध्येही सारीच महाभूते हे सूत्रधार निवेदकाचे काम करत राहतील असेच भासते आहे. 

    64875206_2778987032173072_736997064559168522_n
    विद्युत सामंत (अंजली पाटील)

    १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या घटनेपासून सुरु झालेली ही वेबसिरीज पहिला सिझन संपता संपता येऊन पोहोचते ती प्रतापगडापाशी. १९५७ मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या (क्षितीज झारपकर) पुढाकाराने प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण नेहरूंनी (आरिफ झकारिया) करावे असे ठरले. आणि याच घटनेच्या अवती भोवती, डावे, उजवे, मध्यम असे सारे मतप्रवाह आपली संयुक्त महाराष्ट्राची मागणी घेऊन पोहोचले आहेत. आणि काही तरी थरारक घटना घडणार त्याच नेमक्या क्षणी सिझन संपला आहे. आचार्य अत्रे (आनंद इंगळे), तसेच डाव्या विचारसरणीचे कॉम्रेड डांगे (मनोज कोल्हटकर), एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनात संयुक्त महाराष्ट्र समिती या चळवळीचे नेतृत्व करत होती, पण समाजातील सळसळणाऱ्या तरुण रक्ताच्या कामगार वर्गाची असलेली थोडी धारदार डावी बाजू उभी या मालिकेत अंत्यत दमदारपणे कॉम्रेड अभय सानेंच्या (वैभव तत्ववादी) सोबत उभी असलेली दाखवली आहे.

    65272334_1250264355158571_1087635846770797825_n
    श्रीरंग पत्की – पत्रकार (अभय महाजन)

    या साऱ्या मतमतांतरांचे आपापसातले शह काटशह सुरू असतांनाच संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयावरची साऱ्यांची निष्ठा या साऱ्यातून जे चळवळीचे रसायन जमून आले आहे, ते हुतात्मा सिझन २ मध्ये फार प्रकर्षाने जाणवून येते. एखाद्या आगामी कलाकृतीची इतकी उत्तम झलक क्वचितच पाहायला मिळते. आणि हो, एक नवीन पात्र हुतात्मा सिझन २ मध्ये आपल्या भेटीला येत आहे जे अजूनही गुलदस्त्यातच आहे पण तो आवाज गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका यातून ऐकला आहे. पण मी कोणता आवाज म्हणतोय हे तुम्ही ट्रेलर पहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. पण जर नसेल पहिला तर तुम्ही जर कोणी अजून ट्रेलर पहिला नसेल तर लवकर जरूर पहा. कारण १ जुलै पासून पुन्हा एकदा महाराष्ट्र जन्माच्या कहाणीचा पुढील सिझन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

    ~~~~~

    चित्र सौजन्य – ZEE5 premium

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. राज गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालीला हा चित्रपट साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या उत्तम अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. गोष्टीचा भर या नात्याच्या आजूबाजूने फिरत असला तरी या चित्रपटात घडणारं महाराष्ट्राच्या खेड्यातलं जीवन अत्यंत खुबीने दाखवण्यात यश आले आहे.

    4930286883_7be2623793_b

    शंकर आणि उमा या भावंडांच्या नात्याला धरून पुढे जाणारा हा चित्रपट मराठी ग्रामीण जीवनाच्या अनेक अंगांना अगदी सहजपणे स्पर्श करत जातो. चित्रपट सुरु होतो तोच अगदी मराठी मातीत रुजेलेल्या आणि तुम्हा आम्हाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल अशा गोट्या खेळण्याच्या सीननी आणि तिथून आपण शंकरच्या मागे मागे फिरत हा सिनेमा बघतो. भावाबहिणीच नातं उमलत जातं पण त्याच बरोबर उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं दर्शनही या कथेत घडत जातं. या उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत नक्कीच मराठी मातीत रुतलेलं आहे.

    रक्षाबंधनाच्या वेळेचं गाणं आणि त्या वेळेचं चित्रीकरण आपल्याला थेट ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जात. तिथलं छोट्या छोट्या सणांचं जे उत्साहाचं वातावरण असतं ते अगदी छोट्याशा सीन मधून अगदी छान दाखवल आहे. चित्रीकरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समीर दांडेकर चं कौतुक करावे तितके कमीच आहे. पण याच चित्रीकरणाला सुस्मित लिमये आपल्या पार्श्वसंगीताने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

    50121372_215464939396405_163418471662749537_n

    वास्तविक हे भावाबहिणीचं नातं काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. श्रेयस तळपदे आणि श्वेता प्रसादचा “इक्बाल” तसच संजय सुरी आणि जुही चावलाचा “माय ब्रदर निखील” याच नात्याच्या काही वेगळ्या छटा आपल्यासमोर घेऊन येतात. अगदी इतकंच कशाला, चित्रपटाचा मुख्य विषय नसला तरी “जाने तू या जाने न” मधून दिसणारं जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांच्यातलं भावाबहिणीच नातं मनातल्या काही विशेष तारा छेडून जातं.

    अर्थात या नात्याचं महत्व म्हणा, किंवा आकर्षण म्हणा काय केवळ आपल्यालाच आहे असे नाही. आपल्याकडे जरी याला रक्षाबंधन आणि भाऊबीज असं धार्मिक महत्व असलं तरीसुद्धा साऱ्या जगाला या नात्यातलं प्रेम तितकंच प्रेमळ आणि महत्वाच वाटतं. असेच भावंडांच्या नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू अनेक इंग्रजी चित्रपटांमधून पण हाताळले गेले आहेतच. Her Name Is Sabine असेल, किंवा २००९ चा My Sister’s Keeper असेल, यातून सुद्धा भावंडांमधलं एक वेगळे नाते उलगडायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलं गेला. अजूनही काही चित्रपट आहेत त्याबद्दल आपल्याला या पेजवर माहिती मिळू शकेल.

    पण या साऱ्या सिनेमांपेक्षा धागा या नातेसंबंधाचा एक वेगळा पदर घेऊन आपल्यासमोर येतो. ग्रामीण महाराष्ट्रातील जनमानसावर असलेला रूढी, परंपरा यांचा पगडा किती घट्ट आहे याचाही संदर्भ या चित्रपटात अत्यंत खुबीने गोवला आहे. याबद्दल याचे कथा पटकथा लेखक शाद्वल यांचे विशेष आभार मानायला हवेत. आणि त्याच बरोबर मराठी भाषेचा खास ग्रामीण लहेजा पकडण्याचे काम संवाद लेखकांच्या टीमने अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे कुठेही चित्रपटाची पकड प्रेक्षकांवरून सुटत नाही. डॉ. भाग्यश्री चिटणीसांनी साकारलेली आई तशी पडद्यावर अगदी दोन तीन शॉटपुरतीच आहे पण आई म्हणजे वात्सल्य हे ठसवून गेली आहे. शंकरची मित्रमंडळी आणि उमाचा मित्र सुद्धा आपल्याला अगदी सहज आपल्या आजूबाजूला सापडतील यात शंका नाही.

    उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं काय होतं? वडिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शंकर आपल्या बहिणीची काळजी घेतो का? तिच्या पाठीशी उभा राहतो का? या साऱ्या प्रश्नांना या चित्रपटात अगदी छान आटोपशीर पद्धतीने हाताळले आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्नांनी घर करणे सुरु केले आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…

  • काळजात उतरलेली कट्यार

    काळजात उतरलेली कट्यार

    18192468_1919179508297339_3990675473360239615_o.jpg

    अगदी राजे रजवाड्यांच्या काळापासून साहित्य संगीत नृत्य नाट्य आपल्या महाराष्ट्राला तसे नवे नाही. पण अभिनय आणि संगीत यांच्या एकत्र जोडीने मराठी मनाचा पगडा घेतला तो संगीत नाटकाच्या उदयापासून. देवल, खाडिलकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, राम गणेश गडकरी, इत्यादींपासून सुरू झालेला हा लेखक संगीतकार गायक ही नावं घेत घेत आपण पोचतो ते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यापर्यंत. सौभद्र, शाकुंतल, एकच प्याला, वगैरे नाटकांतून घेतल्या गेलेल्या विषयांपेक्षा एकदम वेगळा विषय दारव्हेकर मास्तर घेऊन आले. तसा तो विषय काही अगदीच अपरिचित होता अशातला भाग नाही. महाराष्ट्राला असलेल्या थोर शास्त्रीय संगीत परंपरेत या विषयाची थोडी बहुत चर्चा होतीच. पण संगीतात अगदी खोलवर रुजलेल्या घराणेशाहीला इतक्या उघडपणे रंगमंचावर आणणे हे सुद्धा एक कौतुकच. आणि या विषयाला चार चांद लावले ते पंडित अभिषेकींनी. दोन घराण्यातील सांगीतिक भेद, वेगवेगळी सौंदर्यस्थानं आणि नाटकातील द्वंद्व अगदी ठसठशीतपणे उभं केलं आपल्या पदांमधून.

    katyar_kaljat_ghusali_ver6

    आणि नुकताच ३० तारखेला याच नाटकावर आधारित अफलातून चित्रपट Zee5 वर रिलीज झाला. सुबोध भावे पुन्हा एकदा ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांसमोर घेऊन आला “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातून. जसं हे नाटक रुपेरी पडद्यावर उभं करणं मोठं कौशल्याचं आणि जबाबदारीचं काम होतं तसंच त्याचं संगीत निर्माण करणं एखाद्या शिवधनुष्यासारखच होतं. अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली आणि वसंतरावांनी अजरामर केलेली पदं पुन्हा रेकॉर्ड करणं आणि शिवाय मूळ चालींमध्ये मिसळून जाईल अशा नव्या चाली बांधणं आजिबात सोपं काम नव्हतं. पण शंकर एहसान लॉय या त्रिकुटानी हे शिवधनुष्य नुसतं पेललं नाही तर त्यावर प्रत्यंचाही चढवली. मूळ नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ या पदाच्या ऐवजी येणार ‘दिल की तपिश’ हे  गाणं अगदी खांसाहेब आफताब हुसेन यांच्या गायकीचे होऊन गेले आहे. आज अभिषेकी बुवा असते तर त्यांनी या चालीसाठी तिघांचे अफाट कौतुक केलं असतं.

    तसे पाहिले तर सारेच भारतीय चित्रपट संगीत प्रधानच. त्यामुळे पाश्चात्य जगात असलेली musical film ही संकल्पना आपल्याकडे वेगळी अशी निर्माणच नाही झाली. पण तरीही मराठी चित्रपटातून काही संगीताच्या सभोवती कथा गुंफलेले काही चित्रपट आधीही होऊन गेले. लोकशाहीर राम जोशी, पिंजरा, आणि काही वर्षांपूर्वी आलेला नटरंग हे चित्रपट महाराष्ट्राच्या लावणीभोवती गुंफले गेले. पण प्रामुख्याने तथाकथित पांढरपेशा समाज आणि तमाशा यांच्यात असलेली दरी मोडून कुण्या एकाचा त्या क्षेत्रात निषिद्ध मानला गेलेला प्रवास या एका समान धाग्याने हे चित्रपट बांधले गेले आहेत.

    या व्यतिरिक्त २००९ मध्ये आलेला जोगवा हा यल्लम्मा देवीच्या नावाने जोगवा मागत फिरणाऱ्या जोगत्यांच्या आयुष्यावरचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट. हे जोगते देवीची भजनं, जोगवे गात गात जोगवा मागत आयुष्य घालवत असल्याने या चित्रपटाची धाटणी सुद्धा एक musical चीच आहे. पण कट्यार… चा विषय आणि सांगीतिक संदर्भच त्याला या साऱ्या चित्रपटांपासून वेगळा काढतो.

    नाही म्हणायला Morning Raga हा शबाना आझमी यांची भूमिका असलेला चित्रपट शास्त्रीय संगीताची बाजू चित्रपटांमध्ये घेऊन आला होता. आजच्या काळात जेव्हा आधुनिक संगीताचा बोलबाला आहे, रॉक मेटल वगैरे संगीत मोठ्या प्रमाणावर सादर होतं अशा वातावरणात शबाना आझमींच्या पात्राला त्यांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत एक मोठया कार्यक्रमात सादर करायची महत्वाकांक्षा घेऊन जगत असते. पण कट्यारमधली महत्वाकांक्षा आपल्याला एका निराळ्याच जगात घेऊन जाते. कट्यारची गोष्ट उलगडते ती राजेरजवाड्यांच्या काळात जेव्हा कला आणि कलाकार राजाश्रयाने वाढत होती. ही एक अप्रस्थापित संगीतशैलीची प्रसिद्धीसाठीची महत्वाकांक्षा आहे.

    ही महत्वाकांक्षा, एक वेगळ्याच पातळीवरचे अटीतटीचे सांगीतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचे ईर्षा, असूया, प्रेम, कालासक्ती असे वेगवेगळे पदर हे सारे एक चित्रपटातून दाखवतांना नाटकात उपलब्ध नसलेलं स्थल स्वातंत्र्य या वेळी सुबोध भावेंनी दिग्दर्शक म्हणून फार सुंदरपणे हाताळले आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहिला असेलच. पण इतकी सुंदर कलाकृती पुनःपुन्हा पाहण्याची संधी आता आपल्या अगदी दारात चालून आली आहे. तेव्हा ही संधी तुम्ही आजिबात दवडू नका आणि अभिषेकी बुवांच्या पदांसोबतच शंकर एहसान लॉय यांच्या गाण्यांचा, सुबोध भावे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर आणि प्रथमच अभिनय करणारे शंकर महादेवन यांच्या उत्तम अभिनयाचा आनंद घरबसल्या हवं तेव्हा नक्की घ्या.