Author: Adi Sathe

  • शांता शेळके – मराठीतली साहित्यागंगा….

    आज सकाळी सकाळी बाहेर फिरत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर एक कागद उडत आला आणि अंगावर पडला. काय आहे ते बघावं तरी म्हणून सहज कागद हातात धरला आणि पावलं थबकली. जुना कागाद होता. आणि त्यावर काही ओळी छापलेल्या होत्या. कविता वाटत होती म्हणून थांबून नीट वाचली. ते जुन्या बालभारतीच्या पुस्तकाचा पान होतं, आणि कविता होती “लाडकी बाहुली” कवयित्री शांता ज. शेळके. तिथेच बाजूला बाकावर बसून ती कविता मन लावून वाचली. किती तरी वर्षांनी ती कविता वाचायला मिळाली. ती पण अगदी अनपेक्षितपणे. कविता वाचता वाचताच मनात शांताबाईंच्या अनेक कविता येऊ लागल्या. गाणी उमटू लागली. जणू त्यांच्या गाण्यांचा आणि कवितांचा कार्यक्रमच मनाच्या थिएटरमध्ये चालू आहे. त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत घेत घरी आलो आणि हे लिहायला बसलोय.

    मला आठवतंय शांता शेळके या नावाशी ओळख झाली ती बालभारतीच्या पुस्तकांतून. शाळेत रुक्ष करून शिकवल्या जाणाऱ्या कवितांमधून खोल मनाचा ठाव घेणाऱ्या त्या मोजक्या कवितांमध्ये शांताबाईंच्या कविता निश्चितच आढळ स्थान मिळवून आहेत. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आज्जी. नातवंडांसाठी अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणाऱ्या. पण घरातही असं होतंच नं की आपले बाबा, काका, आत्या; आज्जी-आजोबांना ज्या नावानी हक मारतात त्याच नावानी आपण मारतो, तसाच आम्ही पण या शांत आज्जीला; शांताबाई शेळके असंच ओळखू लागलो. वास्तविक बालभारातीतून आम्हाला भेटायच्या आधीच शांताबाई आम्हा मुलांना छान छान गाण्यातून भेटल्या होत्या, पण तेव्हा कुठे काही कळत होतं? किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई, अशी आमची अनेक आवडती बालगीत शांताबाईंनी लिहिली हे फार नंतर कळले. सांगण्याचा मुद्दा असा की अगदी औपचारिकपणे म्हणजे नेमून दिले म्हणून अभ्यास करा अशा वातावरणात शांत शेळके या नावाशी ओळख झाली, आणि त्यांच्या शब्दांतून जणू आज्जी आमचे लाड करतेय अशीच जाणीव झाली. मधुर शब्दांमुळेच त्या रुक्ष नावडत्या कविता विभागातून शांत शेळके या नावाशी मनाचा एक घट्ट नातं तयार झालं.

    वय वाढत गेलं, तसे मराठी हा विषय अभ्यासातून मागे पडत गेला आणि नेमून दिलेली कवितादेखील आयुष्यातून बाहेर पडली. पण त्या नेमलेल्या कवितांमधून ज्या शब्दांनी मनात जागा निर्माण केली ते पुनःपुन्हा वाचनात येत राहिले, ते कवी काव्यसंग्रहातून भेटत गेले. शांता शेळके तर फारच जवळच्या. त्यांचे वर्षा, रुपसी इत्यादी काव्यसंग्रह मनात ठसलेले आहेत. कधीतरी आकाशवाणीवर एखादं गाणं लागतं, आवडीचं म्हणून आपण मन लावून ऐकतो. गाणं संपतं, आणि नंतर होणारी उद्घोषणा त्याचा आनंद द्विगुणीत करते. तेव्हा कुठे कळत की हे तर शांतबाईंच गाणं आहे. तरुण वयात आपलीशी वाटणारी अनेक प्रेमगीतं त्यांनी लिहिली. कोळीगीतं लिहिली, “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. पं. जितेंद्र अभिषेकींच्या दोन नाटकांसाठी पदे देखील केली. “काटा रुते कुणाला” हे गझलच्या आकृतीबंधातले पद तर रसिकांच्या मनात अमर पदावर बसले आहे. इतकेच नाही तर “रेशमाच्या रेघांनी”, “नाव सांग सांग सांग नाव सांग”, अशा एकाहून एक ठसकेबाज लावण्या पण त्यांनी रसिकांसाठी दिल्या आहेत. “बांबूच्या वनात” सारखं पायांना हलवणार गाणं तर तरुणांनी डोक्यावर घेतलंय. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय.

    त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही पुस्तक. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपनाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच “पावसाआधीचा पाऊस”, “आनंदाचे झाड”, “वडीलधारी माणसे” हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच बोलके आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे “पाण्यावरच्या पाकळ्या” नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. तसेच त्यांनी ल्युइसा मे आल्कॉट्ट च्या “लीट्टील वूमन” या कादंबरीचा “चौघीजणी” नावानी अनुवाद करून १९६८ साली प्रसिद्ध झालेल्या त्या इंग्रजी कादंबरीतील चार बहिणींचे परस्परांवरील प्रेम, अशा-आकांक्षा, भविष्याबाबतची स्वप्नं, सारे सारे अस्सल मराठीतून आपल्यासमोर मांडले. या भाषांतराला तर फार प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांनी कालिदासाचे आजराअमर काव्य मेघदूत मराठी रसिकांसाठी मराठीत आणले.

    शांताबाईंना त्यांच्या साहित्यासेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील उल्लेखनीय म्हणजे, १९९६ सालचा ग दि मा पुरस्कार. शिवाय त्यांना भुजंग या चित्रपटासाठी भारत सरकारचा गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला तर “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” या गाण्यासाठी सूर सिंगार पुरस्कार मिळाला. तसेच २००१ साली त्यांना यशवंतराव चावण प्रतिष्ठान कडून त्यांच्या साहित्यासेवेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

    शांताबाईंची साहित्यसेवा इतकी अथांग आहे की त्यांना साहित्यागंगा म्हटलेले वावगे ठरणार नाही. फार पूर्वी भगीरथाने स्वर्गस्थ गंगा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणली. पण जणू स्वर्गात साहित्यागंगेची अत्यंत निकडीची आवश्यकता भासली असावी म्हणून कोणी स्वर्गस्थ भगीरथ कॅन्सर च्या रुपात येऊन दिनांक ६ जून २००२ साली ही साहित्यागंगा स्वर्गी घेऊन गेला. तेव्हा पासून शांताबाई आपल्यात त्यांच्या साहित्यारुपाने वावरत आहेत आणि कायमच वावरतील.

     

  • विरहिणी…

    झड पावसाची लागे,
    सृष्टी आनंदाने भिजे.


    सख्या तुझ्या विरहात,
    तरी मन माझे भाजे.

  • पार्टीची स्मारके……….

    बनवली आम्हीही स्मारके लाखो पहा,

    आजची त्या स्मारकांची अवस्था ती पहा..


    मुखी असती घोषणा त्यांच्या जयाच्या,

    मनी योजना स्माराकीच्या पार्टीच्या.

  • विकतचं दुःख …..

    त्या दिवशी मला सुट्टीच होती,
    सकाळ तेव्हाची मजेत जात होती.

    हळू हळू सगळी आन्हिकं उरकली,
    मग हातात पेपारांची गाठ्ठी घेतली.

    सवयीने शेवटचा क्रीडा पान उघडलं.
    पराभवाच्या बातम्यांनी मन उदासल.

    पहिल्या पानांवर कधी जायचाच नसतं,
    खून दरोडे आणि लुटीशिवाय तिथे काहीच नसतं.

    उदास मनानी मग टी व्ही कडे वळलो,
    अहो पण टी व्ही लावून भलताच पस्तावलो.

    कोणत्याच सीरिअलचे एकही पत्र धड नाही,
    नैतिकतेची कुणाला चाडच उरली नाही.

    न्यूज च्यानल पण यातून सुटले नाहीत,
    अमिताभच्या तापाशिवाय ब्रेकिंग न्यूज नाही.

    ही साधनं आता कामाची उरली नाहीत,
    दुःख दैन्न्याशिवाय काहीच विकत नाहीत.

    पण लोकांनाही आता दुसरं काहीच सुचत नाही,
    विकतच्या या दुःखाशिवाय चैनच पडत नाही….

  • पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..

    गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. मग सुरु झाली ती राष्ट्रकुल स्पर्धांचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी. पाठीशी होता राष्ट्रकुल युवा स्पर्धांचा दांडगा (?) अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच?) आणि भल्या मोठ्ठ्या व्यवस्था नामक गाड्याला गती आली. अर्थात कूर्म गतीच होती ती यात वादच नाही. पण कूर्म का होईना गती तर मिळाली.


    हळू हळू दिवस कमी होत होते. कामांच्या फाईली सरकत होत्या. क्रीडांगणे, राहण्याच्या सदनिका आकाराला (?) येत होत्या. मग अचानक लक्षात आला की दिवस फारच कमी राहिलेत आणि कामा तर हवी तशी संपलीच नाहीत. मग लगेच बैठका झाडल्या. भराभर सूचना गेल्या कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अंतिम मुदती सुधारून ठरवण्यात आल्या. मात्र कामगार आणि पैसा मात्र काही वाढला नाही. परिणामस्वरूप कामे उरकायच्या मागे मंडळी लागली. दिवस जवळ येत होते तसे कामे आकाराला येताना आता किमान दिसत होती. पण शेवटी भारत देशात जे होणे तेच झाले. लक्षात असे आले की अरे पुढचे प्रवेशद्वार तर मस्त सजलंय पण बाकी दारांना मात्र अजून गीलावाच झाला नाहीये. म्हणजे सौंदर्य स्थळे तर उत्तम सजली पण आवश्यक सोयी सुविधा, क्रीडांगणे खेळांसाठी तर तयारच झाली नाहीयेत. परदेशी खेळाडूंच्या राहण्याच्या जागा अजून बऱ्याच अपूर्ण आहेत. पुन्हा एकदा बैठका झाल्या, मंत्री गट, अधिकारी गटांच्या भेटी झाल्या. पाहण्या झाल्या. पुन्हा सुधारित मुदती आल्या. थोड्या प्रमाणात साधनसामुग्रीत वाढ झाली. पुन्हा कामे नेटानी सुरु झाली.


    अचानक एके सकाळी लोकांनी त्यांचे दूरदर्शन साचा चालू केला तर बातमी झळकली की राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मग पुन्हा तीच नेहमीच्या घटना सुरु झाल्या. चौकशी समिती, मंत्र्यांच्या बैठका आणि बरेच काही. कलमाडी साहेब आपले छातीठोकपणे सांगत होते की असे काही नाही झालेले सारे काही आलबेल आहे. सर्व तयारी नियोजनानुसार चालू आहे आणि या स्पर्धा यशस्वी होणार आहेत. पण बिचार्यांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच होत नाही. त्यातच भारताचे परम मित्र भारतातील हस्तकांना हाताशी धरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात. नेहमीच्याच साधनांनी हो. बॉम्बस्फोट आणि परदेशी नागरिकांवर गोळीबाराच्या घटना स्पर्धा स्थळा जवळ होतात आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघटना सुरक्षेच्या परीक्षणासाठी डेरेदाखल होतात.


    इतका सगळा झालेला की कमी होतं तर स्पर्धांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळतो. त्याच दुपारी भारत्तोलन; म्हणजेच मराठीत वेटलिफ्टिंग हो; ज्या ठिकाणी होणार त्या सभागृहाचे छत कोसळते. आणि समोर येतो तो बांधकाम या बाबतीतला हलगर्जीपणा आणि स्पर्धांच्या अगदी १० दिवस आधीपर्यंत अपूर्ण असलेली खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणची गैरसोय. अनेक सदनिका अर्धवट झाल्यात, स्वच्छतेच्या नावानी आनंदी आनंदच आहे. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पान तंबाखूच्या पीचकाऱ्यांची नक्षी सगळ्या सदनिकांमध्ये काढली आहे. गाद्यांवाराच्या चादरी तर कोणे एकेकाळी पांढऱ्या असतील अशा जाणवत होत्या. त्यावर बरेच डाग पडलेले होते.
    दरम्यानच्या काळात निसर्गानी पण आपले हात साफ करून घेतले. आयतीच सारी माणसे कोंडीत सापडलेली त्याला. धुंवाधार पाऊस पडला आणि दिल्लीत कधी नव्हे तो भला थोरला पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.पुन्हा एकदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभा करायला क्रीडानागरीतला कोराकार्करीत रस्ता पार खचून गेला. सदनिकांमध्ये पाणी साचलं, दिल्लीत डेंग्यूची साथ पसरली. हि सगळी वृत्ते परदेशी वृत्तामाध्यामांतून प्रसिद्ध झाली आणि अनेक अग्रमानांकित खेळाडूंनी स्पर्धेतून माघार जाहीर केली. इतकं सगळं झालं तेवा कुठे पंतप्रधानांनी मध्ये हस्तक्षेप करून बैठक घेतली, स्वच्छतेचा, सुरक्षेचा, अपुर्या कामांचा सगळ्या बाबींचा आढावा घेतला. आणि बाकीची कामे २४ ते ४८ तासात पूर्ण करायला सांगितली.


    आता मला सांगा जे इतक्या वर्षात जमला नाही ते १-२ दिवसात होणारे का? आणि इतकं सगळं झालं तरी कलमाडी साहेब आपले तेच पालुपद लावून आहेत. “सारे काही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे, स्पर्धा नक्की यशस्वी होणार.” नाही म्हणायला राष्ट्रकुल स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी थोडा अनुकूल विचार मांडलाय; तयारी समाधानकारक आहे म्हणून. पण एकंदरीत परिस्थिती आणि वृत्ते बघता सामान्य जनतेचे मत तर ठाम झालंय. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे आणि या सगळ्यांनी आपापली खा ती उत्तम सांभाळून देशाची शान जगात पार धुळीला मिळवली आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे “बघा बघा बघा सगळी कामे नित चालू आहेत. १-२ दिवसात बाकी कामे संपतील…आम्ही कितीही जोरात पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…”

  • चला मंडळी राम राम….

    बरंय भक्त मंडळींनो, दहा दिवस कसे गेले कळलंच नाही न? हे दहा दिवस मी तुमच्याबरोबर खूप मजेत घालवतो दर वर्षी. नेहमी वाटत; तुम्हाला सोडून जाऊ नये. पण काय करणार? येतानाच नवा मोबाईल घेतलाय नं. मिस कॉल्सचा पाऊस पडेल हो लगेच त्यावर. इथे काय किंवा स्वर्गात काय, घरची मंडळी सगळी सारखीच!!!


    तुम्हा अबालवृद्धांचा उत्साह पहिला की खूप बरं वाटत. जाणवतं, आहे; या भौतिक जगात अजून थोडी अध्यात्मिकता आहे. या दहा दिवसांत काय काय मजा करता ते तुम्ही, आणि मी मात्र आपला एका जागी बासून असतो. कधी कधी पार कंटाळून जातो, पण काय करणार? “आलीय भोगासी असावे सादर….” इथे बसल्या बसल्याच एन्जोय करतो आपला. एकटाच…..


    मी असं ऐकलय की तुम्ही महिनाभर आधीपासून कामाला लागता? ते पण दिवसरात्र एक करून आणि स्वतःचे नोकरी-धंदे सांभाळून. दमत नाही का तुम्ही लोकं? कधी कधी थोडे दिवस आधीच यावंसं वाटतं; तुमच्या बरोबर कामं करायला. पण काय करू? हाय कमांड सुट्ट्याच देत नाही नं, रेशनिंग आहे सुट्ट्यांच!!!! सुट्टी मोजून दहा दिवस. असो… हे दहा दिवस तरी मिळतात यातच समाधान..


    सध्याच्या दिवसात तुम्ही माझ्या निमित्तानी का होईना, चार चांगली कामं करता ते बघून फार बरं वाटत. कुणी अनाथांना, अंध-अपंगांना मदत करतं, तर कुणी निसर्गानी झोडपलेल्यांना. खरंच लोकमान्न्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. काही नाठाळ मंडळी असतातच, गर्दीचा फायदा घेणारी, लोकांना लुबाडणारी. फार राग येतो तेव्हा, पण शिक्षा करता येत नाही नं. शस्त्र सगळी घरीच असतात. आपल्या माणसांत हवीत कशाला शस्त्र? म्हणून घरीच ठेवतो. हातावर हात ठेवून बघत बसावं लागतं. मग आम्हीपण आमच्या ऑर्गनाईझर मध्ये नोंदून ठेवतो शिक्षांची यादी, घरी गेल्यावर उरकायची कामे म्हणून.


    काही गोष्टी मात्र नाही आवडत हं तुमच्या आजीबात मला. केवढा थर्माकोल अन प्लास्टिक वापरता तुम्ही लोकं आरास करायला! अहो तुम्हालाच त्रास होणारे त्याचा. अहो तो थर्माकोल तयार करताना तुमचा ओझोन खराब होतो नं. भोकं पडतात त्याला. आणि काय तो टेप अन चा आवाज, बापरे; अजून काही दिवस राहिलो तर नक्कीच ठार बहिरा होईन. तुम्हाला नाहीका त्रास होत? अहो आणि तुमच्या आजूबाजूला सगळेच ठणठणीत नसतात. आजारी लोकांना त्रास होतो इतक्या मोठ्या आवाजाचा. जरा काळजी घ्या त्यांची सुद्धा. तेवा या गोष्टींवरचा खर्च कमी करून आसपासच्या लोकांसाठी काही स्पर्धा ठेवा. स्थानिक कलाकारांना वाव द्या. त्यासाठी मी कमी प्रकाशात राहीन. कमी गाणी ऐकीन, मला चालेल. चालेल कसलं पळेल. मलाही त्रास होतोच की आवाजाचा. आणि असेही तुम्ही लावता ती गाणी मला आजीबात आवडत नाहीत… अरे काही अर्थातरी असतो का त्यांना?


    यावर लेक्चर देत बसलो तर उशीर होईल. निघायला हवे आता. परत एक मिस कॉल आला बघा घरून. फक्त शेवटी सांगितलं ते लक्ष ठेवा हं. मग काय भेटूच पुढच्या वर्षित. पुन्हा तीच धमाल, तीच मजा. तोपर्यंत..
    राम राम…..